पुणे – कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या बंदी आदेशाच्या संदर्भातील अधिसूचना मुख्य सचिव अजोय मेहता यांनी जारी केली. या अधिसूचनेनुसार अत्यावश्यक आणि नाशवंत वस्तू वगळता अन्य सर्व वस्तूंच्या दळणवळणासाठी राज्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळाच्या बसेस आणि मेट्रोसह एका शहरातून दुसऱ्या शहराला जोडणाऱ्या सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा बंद असतील. चालकाव्यतिरिक्त अन्य दोन व्यक्तींसाठी टॅक्सी तर एका प्रवाशासह ऑटो रिक्षा यांना अधिसूचनेत नमूद केलेल्या कारणांसाठी वाहतूक करता येईल.
अत्यावश्यक वस्तू आणि सेवा पुरविणाऱ्या खालील दुकाने आणि आस्थापने यांना वरील निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.
– बॅंका/ एटीएम, विमा आणि अन्य संबंधित सेवा
– मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे
– टेलिकॉम, टपाल, इंटरनेट, डेटासेवा यांसह माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सेवा.
– अत्यावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी आणि वाहतूक
– शेतमाल आणि अन्य वस्तूंची निर्यात आणि आयात
– खाद्यपदार्थ, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांसह अत्यावश्यक वस्तूंचे ई-कॉमर्सद्वारे वितरण
– खाद्यपदार्थ, किराणा, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे यांची विक्री, वाहतूक आणि साठवण
– बेकरी आणि पाळीव प्राण्यांसाठीचे खाद्यपदार्थ आणि पशुवैद्यकीय सेवा
– उपाहारगृहांमधून घरपोच सेवा
– रुग्णालये, औषधालये आणि चष्म्याची दुकाने, औषधांचे कारखाने, विक्रेते आणि वाहतूक
– पेट्रोल पंप, एलपीजी गॅस, ऑईल एजन्सीज त्यांची साठवण आणि त्यांच्याशी संबंधित वाहतूक व्यवस्था
– अत्यावश्यक सेवांकरिता खासगी संस्थांमार्फत पुरविल्या जाणाऱ्या सुरक्षासेवेसह अन्य सेवा देणाऱ्या संस्था
– अत्यावश्यक सेवांना किंवा करोना प्रतिबंधासाठी होणाऱ्या प्रयत्नांना मदत करणारी खासगी आस्थापने.
– वरील बाबींशी संबंधित पुरवठा साखळी