31 डिसेंबर जसजसा जवळ येतो तसा मला आठवतो तो, कोलकत्याच्या माझ्याआठव्या मजल्यावरच्या घराच्या बाल्कनीतून दिसणारा तो अवर्णनीय असा सूर्यास्त! कारण, त्यावेळी कोलकत्यात उंच इमारती अत्यंत कमी होत्या नि डोंगर हा प्रकार तर नव्हताच. त्यामुळे आमची बाल्कनी ते क्षितीज यामध्ये तर एकही अडथळा नसल्यानं क्षितिजाचा खूप मोठा आवाका नजरेत सामावला जायचा. म्हणून सूर्यास्ताचं दर्शनही फार सुंदर होत असे. 31 डिसेंबरला तर संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या आधीच मी बाल्कनीत बसून रहात असे. आणि सूर्य क्षितीजाच्या रेषेत लुप्त होईपर्यंतच ते अप्रतिम दृश्य मी डोळ्यात साठवून ठेवत असे.
मात्र, शेवटी त्याची वेळ तो पाळायचाच… सूर्यास्त व्हायचा. त्या वर्षीचा तो शेवटचा सूर्यास्त! त्याला नमस्कार करण्यासाठी नकळतपणे माझे हात जोडले जात नि डोळे बंद होत. मला माहीत आहे की, उगवतीला तर सारेच नमस्कार करतात. पण या दिवशी मी मावळतीलाही करायची. तेव्हा माझ्या मनात विचार येत की, खरं तर सूर्य प्रत्येक दिवशीच उगवतो आणि मावळतो. त्याचं काम तो करतच असतो. मात्र 31 डिसेंबरचा सूर्यास्त हा महत्त्वाचा वाटतो.
कारम, नववर्षाची पहाट तोच तर आणत असतो ना! त्या पहाटेच्या समवेत असतात नव्या आशा, आकांक्षा, नवे संकल्प, नव्या कल्पना, नवे नेम, नवे बेत आणि असं बरंच काही नवं-नवं. अशी ही नव्या सकाळच्या आधीची पहाट जिचा निर्माता असतो, हा सूर्य! काही तासच आधी वर्तमानकाळात असलेले ते बहुमूल्य “क्षण’ हे भूतकाळात जमा होतात आणि त्या क्षणांच्या आठवणी बनतात… काही गोड तर, काही कटू.’ “आहे’ चा बदल “होत’ मध्ये होऊन भविष्य काळातल्या “होईल’चा बदल वर्तमानकाळातल्या “आहे’ मध्ये होतो. कालचक्राची अनादी अनंत कालापासून चालत आलेली ही “एक अद्भूत दलाबदल, जनमानसालाही नक्कीच विचार करायला लावणारी अशी आहे.
– रोहिणी महाजन