प्रख्यात अभिनेते, नाटककार आणि संवेदनशील साहित्यिक डॉ. गिरीश कर्नाड हे व्यक्तिमत्त्व आज काळाच्या पडद्याआड गेले. गेली सुमारे चार दशके कला आणि साहित्य क्षेत्रात या माणसाने भरीव योगदान दिले आहे. या भरीव कामगिरीचे मूल्यमापन त्यांना मिळालेले पुरस्कारांमध्येच करायचे ठरवले तर देशातील कला क्षेत्रातला एकही मानाचा पुरस्कार त्यांना मिळायचा राहिलेला नाही. पद्मश्री, पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी, साहित्य अकादमी, ज्ञानपीठ, कालिदास सन्मान, एकूण पाच फिल्मफेअर पुरस्कार, दहा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि अन्य असे कितीतरी पुरस्कार या व्यक्तिमत्त्वाच्या नावावर जमा आहेत. त्यातून त्यांच्या एकूणच कारकिर्दीची व्याप्ती लक्षात यावी. साहित्य कला क्षेत्रातील हा मोठा माणूस जन्माने महाराष्ट्रीय होता. नंतर कन्नड ही त्यांची कर्मभूमी झाली असली तरी ते जन्माने महाराष्ट्रीय होते याचा अभिमान मराठी मनाला झाल्याशिवाय राहात नाही.
बादल सरकार यांना बंगालीत आणि विजय तेंडुलकरांना मराठीत जे स्थान आहे तेच स्थान त्यांना कन्नड प्रांतात होते. 1960 च्या सुमाराला त्यांनी रंगभूमीवर प्रवेश केला आणि त्यांनी बघता बघता सारी कन्नड रंगभूमी व्यापून टाकतानाच आपल्या स्वलिखित नाटकांची इंग्रजीत भाषांतर करून जागतिक स्तरावरही आपले नाव केले. रंगभूमीवरचा प्रचंड दबदबा त्यांना दाक्षिणात्य चित्रसृष्टी आणि मुंबईच्या बॉलीवूड चित्रसृष्टीत उपयोगी पडला आणि तेथेही त्यांनी भरीव कामगिरी नोंदवली आहे. चित्रसृष्टीतही ते केवळ अभिनेते म्हणूनच वावरले नाहीत तर कथाकार, पटकथाकार, दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. त्यांची शैक्षणिक कारकीर्दही वैविध्यपूर्ण आहे. त्याची नोंद घेतल्याशिवाय त्यांच्याविषयी लिहिताना पुढे जाता येणार नाही. मूळ गणित आणि संख्याशास्त्रात पदवी पूर्ण करणाऱ्या गिरीश कर्नाड यांनी पुढील काळात इंग्लंडला जाऊन फिलॉसॉफी, राजकारण आणि अर्थशास्त्र यांचा अभ्यास केला.
फिलॉसॉफीत त्यांनी मास्टर्स डिग्री मिळवली आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांनी राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयातही नैपुण्य प्राप्त केले. या समृद्ध शैक्षणिक कारकिर्दीचा त्यांना कला व साहित्य क्षेत्रातील कार्यात निश्चितच लाभ झाला असणार. त्या शिवाय त्यांना या क्षेत्रात इतके सर्वस्पर्शी आणि संवेदनशील योगदान देता येणे शक्य झाले नसते. महाभारत आणि अन्य प्राचीन भारतीय साहित्य संपदेचाही त्यांनी अभ्यास केला होता. महाभारतकालीन अनेक व्यक्तिमत्त्वांनी ते प्रभावित झाले होते. त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन त्यांनी आधुनिक संदर्भातील नाटकांच्या व्यक्तिरेखा साकारल्या. त्यांच्यावर पाश्चात्य साहित्याचाही मोठा पगडा होता. त्याचाही त्यांनी भारतीय रंगभूमीवर चांगला उपयोग करून घेतला. त्यामुळे रंगभूमीवरील त्यांच्या नाट्यलेखनाला वेगळेपण प्राप्त झाले.
1964 पासून ते नाट्यलेखन करीत आले आहेत. त्यांचे 64 सालातील तुघलकांवरील नाटक हे त्यांच्या पदार्पणातील वेगळेपणाची साक्ष ठरले आणि त्यानंतर त्यांनी कन्नड रंगभूमीवर अशाच वेगवेगळ्या जातकुळीची नाटके सादर केली. 1970 ला त्यांनी “समस्कारा’ या कन्नड चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णकमळ मिळाले आहे. वर्षभरातच त्यांनी चित्रपट दिग्दर्शनाचेही क्षेत्र पादाक्रांत केले. त्यांनी दिग्दर्शित केलेला “वमशा वृक्ष’ नावाचा कन्नड सिनेमा त्यांना दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गेला. चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्याला मुंबईच्या बॉलीवूडमध्ये जोपर्यंत कामाची संधी मिळत नाही तोपर्यंत तो चित्रपट कलाकार म्हणून अधुराच गणला जातो. त्यानुसार त्यांनी मुंबईच्या हिंदी चित्रसृष्टीतही कामाची संधी घेताना निशांत, मंथन, स्वामी, पुकार अशा अनेक चित्रपटांचे योगदान दिले आहे.
सन 2005 मध्ये आलेल्या “इक्बाल’ नावाच्या चित्रपटात त्यांनी रंगवलेला कडक शिस्तीतील क्रिकेट प्रशिक्षक अनेक जाणकारांची दाद घेऊन गेला. अगदी अलीकडे त्यांनी यशराजच्या बॅनरखालीही “एक था टागयर’ आणि “टायगर अभी जिंदा है’ या चित्रपटांतही योगदान दिले आहे. गिरीश कर्नाड म्हणजे आर्ट फिल्मवाले अभिनेते अशी त्यांची प्रतिमा असली तरी मुख्य प्रवाहातील हिंदी चित्रपटातही त्यांनी आपले योगदान दिले आहे. इतक्या समृद्ध योगदानानंतर कोणत्याही माणसाला त्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तीची योग्यता लाभते. त्या पार्श्वभूमीवर डॉ. कर्नाड यांना अनेक ठिकाणी प्रमुख वक्ता किंवा व्याख्याता म्हणून निमंत्रित केले जाई.
अशा ठिकाणी मात्र त्यांनी काहीवेळा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी मोठेच वादळ उडवलेले अनुभवाला आले आहे. पण या वादळाची अथवा त्या अनुषंगाने होणाऱ्या टीकेची त्यांनी पर्वा केली नाही. मध्यंतरी त्यांनी थेट रवींद्रनाथ टागोर हे एक सामान्य प्रतिभेचे नाटककार होते असे वक्तव्य करून राळ उडवून दिली होती. रवींद्रनाथांची नाटके पाहणे म्हणजे एक कंटाळवाणा प्रकार असतो, असे ते म्हणाले होते. मुंबईत 2012 साली झालेल्या टाटा साहित्य फेस्टिव्हलमध्ये ते व्ही. एस. नॉयपॉल यांच्यावरच घसरले. विशेष म्हणजे ज्या संस्थेने डॉ. कर्नाड यांना त्यांच्या रंगभूमीवरील अनुभवाबद्दल बोलण्यासाठी पाचारण केले होते त्याच संस्थेने या आधी नॉयपॉल यांनाही सन्मानित केले होते. पण डॉ. कर्नाड यांनी टाटा साहित्य फेस्टिव्हलच्या संयोजकांवर नॉयपॉल यांच्यासारख्या माणसांचा तुम्ही सन्मान करूच कसा शकता, असा प्रश्न उपस्थित केला होता.
आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी प्रखर हिंदुत्वाचा तीव्र विरोध केला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि बहुसांस्कृतिकवादाचे ते कट्टर समर्थक होते. बंगळुरूच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला टिपू सुलतान यांचे नाव द्यावे, अशी मागणी करून त्यांनी अनेकांचा रोष ओढवून घेतला होता. हिंदुत्वावर त्यांचा जो प्रचंड रोष होता त्यातून त्यांच्यावर सातत्याने टीका झाली. असे म्हणतात कर्नाटकात गौरी लंकेश यांचे जे मारेकरी होते त्यांच्या हिटलिस्टवर डॉ. गिरीश कर्नाड यांचेही नाव होते. त्यांच्या मतांविषयी लोकापवाद असतीलही, पण त्यामुळे त्यांनी साहित्य, कला क्षेत्रात दिलेले भरीव व सकस योगदान दुय्यम दर्जाचे ठरत नाही. कल्पकता आणि वैविध्य जोपासत या माणसाने दिलेल्या योगदानाबद्दल ते अनेकांच्या कायमचे स्मरणात राहतील. त्यांच्या स्मृतीला आमचे विनम्र अभिवादन.