जवळार्जुन प्रतिनिधीः १२ जानेवारी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी पासून पौष पौर्णिमेपर्यंत शाकंभरी उत्सव साजरा केला जातो. जेजुरीमध्ये श्री खंडोबा सोबत म्हाळसादेवी आणि बाणाई असल्याने या मल्हारी मार्तंडाच्या मंदिरामध्येही आज शाकंभरी उत्सव मोठ्या उत्साहात साजर करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधत मंदिराच्या गाभाऱ्यात फळभाज्या आणि पालेभाज्यांची आरास करण्यात आली आहे. पालेभाज्या व फळभाज्यांची आरास करण्यासाठी साधारणपणे 300 किलो पालेभाज्या, फळभाज्या व शेंगवर्गीय भाज्या वापरण्यात आल्या आहेत. खंडोबा दिवाचे नित्य वारकरी, पुजारी वर्ग, कर्मचारी सेवकरी वर्गांने परीश्रम घेऊन आरास करण्यात आली आहे.
म्हणून केली जाते ही आरास
पौराणिक कथेनुसार जेव्हा पृथ्वीवर महाप्रलय आला होता. सर्वत्र अन्नधान्याची टंचाई होती, तेव्हा त्रैलोकातील दुःख पाहून ऋषींनी शाकंबरी मातेची प्रार्थना केली. मग शाकांबरी देवीने भाजी आणि वृक्षवेलींच्या रूपाने विश्वाचे पालन पोषण केले आणि विश्वाचा नाश होण्यापासून वाचवले. त्यामुळे शाकंभरी उत्सवाच्या काळात हिरव्या पालेभाज्या फळभाज्या आणि शेंगवर्गीय भाज्यांची पूजा केली जाते. त्याचा प्रसाद भाविकांमध्ये वाटला जातो.