सातारा – साताऱ्यात 1993 मध्ये 66 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. या घटनेला आता 30 वर्ष उलटली. सातारकरांना पुन्हा एकदा अस्सल साहित्य अनुभव मिळण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात व्हावे या संमेलनाचे यजमान पद स्वीकारल्यानंतर सातारा मान्यवरांच्या स्वागतासाठी कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली
सातारा नगरपरिषद व महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या अमृत महोत्सव निमित्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. श्री. नायगावकर यांच्या प्रकट मुलाखती कार्यक्रमादरम्यान आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी सुद्धा शैलीदार फटकेबाजी केली. ते म्हणाले, “”निर्भीडता हा साहित्याचा अत्यंत जवळचा स्थायीभाव आहे.
समाजाच्या रचनात्मक कार्यासाठी तो दिशादर्शक आहे. निर्भीड लिखाणाची महाराष्ट्राची मोठी परंपरा आहे आणि हास्य कवी नायगावकर समाजातील व्यंगावर नेमकेपणाने बोट ठेवतात. मध्यंतरी साताऱ्यातील साहित्य कामाला मरगळ आली होती. मात्र, विनोद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली मसाप शाहूपुरी शाखेचे काम अधिक ऊर्जावान बनले आहे.”साताऱ्याला 1993 मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान मिळाला होता. या घटनेला तीस वर्षे उलटली. साताऱ्यातील रसिकांना पुन्हा साहित्य आस्वाद देण्याकरता साताऱ्यामध्ये निश्चित पुन्हा एकदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावे.
साहित्य संमेलनासाठी सातारा गेली दोन वर्ष मागणी करत आहे. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव हे यजमानपद साताऱ्याला दिले गेले नाही. यंदा मात्र पुन्हा एकदा सातारा यजमानपद स्वीकारण्यासाठी तयार असून साहित्यिकांच्या स्वागतासाठी सातारकर कुठेही कमी पडणार नाहीत, अशी स्पष्ट ग्वाही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. वाचन संस्कृतीला बळ द्यायचे असेल तर साहित्य संमेलनासारखे मोठे उपक्रम साताऱ्यात आलेच पाहिजेत, असा आग्रह त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष व ज्येष्ठ लेखक प्रा. मिलिंद जोशी यांच्याकडे धरला आहे. सातारा नगरपालिकेच्या एकही कर्मचारी अथवा अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित नव्हता, याची खंत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केली.