वाघोली (प्रतिनिधी) : रिंगरोड बाधित शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता सोशल मिडीयाच्या माध्यमातून आंदोलन करणार असल्याची माहिती बकोरी येथील शेतकरी प्रल्हाद वारघडे पाटील यांनी दिली आहे.
सध्यस्थितीत शासनाकडून रेल्वे प्रकल्पासाठी व रिंगरोडसाठी भूसंपादन प्रक्रिया चालू आहे. शासनाने शेतकऱ्यांना कुठलीही पूर्व कल्पना न देता शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यासाठी वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत. परंतु बाधित शेतकऱ्यांनी याला तीव्र विरोध दर्शविला आहे.
बाधित शेतकऱ्यांनी रास्ता रोकोसह जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्याच्या विचाराधीन होते. परंतु कोरोना संसर्गाची पार्श्वभूमी लक्षात घेता बाधित शेतकऱ्यांकडून सोशल मिडीयाच्या माध्यमातून फोटो, व्हिडिओ, ऑडीओद्वारे लोकशाही मार्गाने आपापल्या घरी, शेतात उभे राहून जनांदोलन उभारण्यात येणार आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी राज्य शासन, केंद्र शासनापर्यंत व्यथा पोहचविणार आहेत. याबाबत शेतकऱ्यांच्या वतीने पालकमंत्री अजित पवार यांचेसह महसूलमंत्री, विभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. शासनाकडून विकासाच्या नावाखाली भांडवलदार धार्जिनी प्रकल्प राबविला जात आहे.
शेतकऱ्यांना विश्वासात न घेता भूसंपादन सुरु केले आहे. या प्रकल्पाला बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून सोशल मिडीयाच्या माध्यमातून आंदोलन उभारणार असल्याचे प्रल्हाद वारघडे पाटील यांनी सांगितले आहे.