अरुण गोखले
देहाच्या साधनाचा वापर करून देव जोडायचा तर तो कसा? हे संत तुकोबारायांनी आपल्या एका अभंगातून फार मार्मिकपणे सांगितले आहे, ते म्हणतात-
घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ।
डोळे तुम्ही घ्यारे सुख । पहा विठ्ठलाचे मुख ।।
आईकाहो तुम्ही कान । माझ्या विठ्ठलाचे गुण ।
मना तेथे धाव घेई, राही विठ्ठलाचे पायी ।
तुका म्हणे अरे जीवा, नको सोडू या केशवा ।।
“तुका म्हणे अरे जीवा’, असे म्हणत असताना ते जसे स्वत:च्या जीवाला तू काय कर आणि कसा तो नारायण जोड हे सांगतात. तसाच तो “अरे जीवा’ हा शब्द तुम्हा आम्हासही जागविणारा आहे. त्यांना हेच सांगायचे आहे की बा माणसा! अरे तुला हा देह देवाने त्याला ओळखण्यासाठी, पाहण्यासाठी, त्याच्याशी जवळीक साधण्यासाठी दिला आहे.
त्याने तुला जे वेगवेगळे शारीरिक अवयव दिले आहेत त्यांचा तू सुयोग्य वापर कर. तो कसा कर? तर देवानी तुला जी वाणी दिली आहे त्या वाणीने म्हणजेच वाचा शक्तीने तू त्याचेच सतत नामस्मरण कर. ही सवय तू प्रयत्नपूर्वक लावून घे. तू डोळ्यांनी त्या ईश्वराचे सगुण साकार रूप पाहा. ते हृदयात साठवून घे.
वाचे सोबतच त्या कृपाळू देवाने तुला श्रवणाची शक्ती दिली आहे. त्यासाठी त्याने तुला कान दिले आहेत. त्या कानांनी तू काय ऐकणे हे अभिप्रेत आहे, तर ते त्या श्रीहरीच्या गुणवर्णन कथा ऐक. त्याचा नामाचा गजर ऐक.
हे सारं कसं करशील तर ते मनापासून कर. त्यासाठी तू काय कर, तर त्या सावळ्या विठ्ठलाकडेच धाव घे. वीटेवरच्या त्या समचरणांनाच घट्ट घरून ठेव. त्या केशवाला तू तुझी भाव मिठी घाल. त्या आत बाहेरच्या देवाला एकमेकांशी एकरूप होऊ दे. बाबारे! हा भगवंत सहजासहजी कोणालाही सापडत नाही.
त्याला हे असे डोळ्यांनी त्याचे रूप पाहून, कानांनी त्याचे गुण ऐकून, वाचेने त्याचे सतत नामस्मरण करून, हृदयाच्या मंदिरात त्याला दृढ श्रद्धेच्या आसनावर बसवावे लागते. एकदा का हा देव तुझ्या मनात घर करून बसला ना की तुझ्या देहाचा देव्हारा व्हायला वेळ लागत नाही. पण हे कधी? तर, केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हे विसरून चालणार नाही.