– अरुण गोखले
एकदा असे झाले की, रामकृष्ण परमहंस आणि त्यांचा शिष्यवर्ग यांच्यात कसलीशी चर्चा चालू होती. चर्चेचा विषय असा होता की, मानवी जीवनात गुरूची गरज आहे की नाही? तर त्या संवादात स्वामींच्या काही बुद्धीनिष्ठ लोकांचे म्हणणे असे होते की, जर माणसाला त्याच्या पूर्व संचिताप्रमाणे या जन्मात सुख, दु:ख हे भोगावे लागते. ते ज्याचे त्यानेच भोगून संपवायचे असते, तर मग हा गुरू करण्याचे प्रयोजन काय, त्याची गरज काय? गुरू केल्याचा काय आणि कोणता फायदा होतो?
तेव्हा रामकृष्णांनी त्या लोकांचे ते सर्व म्हणणे ऐकून घेतले आणि मग त्यांना जीवनातले गुरूचे महत्त्व काय? गुरूची गरज काय? या त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देताना ते म्हणाले, “बाबांनो! तुमचे म्हणणे बरोबर आहे. प्रत्येक जीवाला त्याच्या त्याच्या प्राक्तनाप्रमाणेच सुख, दु:ख हे भोगावे लागते. ते त्याचे त्यानेच भोगायचेही असते, हेसुद्धा खरे. मग असे असताना गुरूची गरज काय, हा जो तुमचा प्रश्न आहे त्याचं उत्तर असं की गुरू हे तुम्हाला तुमच्या जीवनातील अडीअडचणी, समस्या यांना सामोरे जाण्याचे बळ देतात.
ते तुमच्या पाठीशी उभे राहतात. तुम्ही जर अगदीच खोल पाण्यात गटांगळा खाणार असाल आणि तुमचा जीव जर धोक्यात जाणार असेल तर गुरू हा अशा प्रसंगात तुम्हाला आधाराचा हात देतो, बळ देतो, शक्ती देतो. जे खरोखरच तयारीचे सद्गुरू असतात ना ते तर प्रसंगी तुमचे प्राक्तनही काही वेळा बदलतात, तसे दाखले आपल्याला आपल्या पुराणातल्या कथांत वाचायलाही मिळतात.
दुसरी गोष्ट अशी की, आपण करीत असलेल्या प्रापंचिक अथवा पारमार्थिक इप्सित साध्य गाठण्याच्या साधनेत गुरू हे आपल्याला सहाय्यक, मार्गदर्शक, प्रेरक ठरतात. हे बघा, समजा की एका व्यक्तीला इथून कोलकात्यास जायचे आहे. तो मनुष्य जर नावेने गेला तर त्याला किती वेळ लागेल?’
शिष्यांनी उत्तर दिले, “किमान चार-पाच तास.’ त्यावर स्वामी म्हणाले की, “तीच नाव जर एका जहाजाला जोडली तर ती किती वेळात जाईल?’ उत्तर आले की, “अर्ध्या पाऊण तासात.’ तेव्हा काहीसे हसत रामकृष्ण म्हणाले, “आपला गुरू हेच ते जहाज असते जे तुमची छोटी नाव ही लवकर किनाऱ्याला नेऊन लावते.’