– अरुण गोखले
समजा की आपण कोणाही व्यक्तीला सहजपणे विचारले की, काय रे तू केव्हा उठतोस? किंवा केव्हा उठतेस? तर त्याची सर्वसाधारणपणे उत्तरे ही अशी येतात की- मोबाइलचा अलार्म झाल्यावर, घड्याळाचा गजर वाजल्यावर, आई, पत्नी, मुले यांनी हाक मरून उठवल्यावर मी चटकन उठतो/उठते.
फार कमी लोकांकडून “तू कधी उठतोस’ या प्रश्नाचे उत्तर “मला पहाटे सहज जाग आल्यावर मी उठतो’, असं उत्तर मिळतं. त्याचं काय आहे ही आपल्याला सहजपणे येणारी जाग हीच खरी जीवाची जागृती आहे, खरे जागे होणे आहे. वास्तविक आपल्या या नित्याच्या अनुभवावरून आपण हे जाणून घ्यायला हवं की, रात्री आपण निजतो; पण सकाळी आपल्याला कोण उठवते? हा प्रत्येकानेच विचार करण्यासारखा आहे.
कारण जर मोबाइलचा अलार्म वाजूनही, घड्याळातला गजर होऊनही, आपल्या जीवलगांनी हाका मारूनही आपल्याला जाग आली नाही तर काय होते? नको तो विचारही करायला नको. कारण तसं जेव्हा होते ना तेव्हा आपले आपण न उठल्याने मग इतर जमा झालेले चार लोक आपल्याला उठवतात, तेही खांद्यावर घेऊन.
याचाच दुसरा अर्थ काय तर जीवाचे जागे होणे हा त्याचा जन्म आहे. तर त्याचे कायमचे निजणे, घोर निद्रेतून जागे न होणे हा त्याचा मृत्यू आणि म्हणूनच की काय अध्यात्मात असे म्हटले आहे की, प्रत्येक माणसाची निद्रा आणि त्याचे जागे होणे या जणू त्याच्या जन्म-मरणाच्याच खुणा आहेत. माणूस हा जन्म-मरणाचा अनुभव नित्य घेतच असतो.
इथे आपल्याला हे जाणून घ्यावे लागते की, आपल्या सर्व दैनंदिन क्रिया या वेळेवर घडविणारी आपला हा पंच महाभूतांचा स्थूल देह क्रियाशील राखणारी, त्यातले चैतन्य सळसळते ठेवणारी कोणती तरी अज्ञात शक्ती ही आपल्या आत आहे. तिच्या सत्तेवरच आपला सारा खेळ चालू आहे. म्हणूनच आपल्याला असा एक मोलाचा सल्ला दिला जातो की,
दिवसभराचे काबाडकष्ट करून झाल्यावर झोपेस जाण्याच्या आधी त्या आत्मारामाला आपण हात जोडून प्रार्थना करावी की “हे रामा! मी आता तुझे नामस्मरण करीत निजतोय, तुझ्या कृपेने मला शांत झोप लागू दे आणि उद्या सकाळी तुझ्याच नामस्मरणात मला जाग येऊ दे. आता निजतोय मी पण मला उद्या उठव मात्र तूच’.