एखादी वस्तू ही जेव्हा अग्नीत जळते तेव्हा तिची राख होते. राख आणि विभूती ह्या दोन्ही गोष्टी जरी वरकरणी दिसायला सारख्याच दिसत असल्या तरी त्यांच्यात जमीन- अस्मानाचे अंतर आहे. साईबाबांच्या दरबारात ज्या गोष्टीचे सर्वसामान्य लोकांना विशेष आश्चर्य वाटत असे त्यातीलच एक गोष्ट म्हणजे तिथली अखंड प्रज्वलित असलेली धुनी.
जेव्हापासून बाबांनी ती धुनी प्रज्वलित केली आहे, तेव्हापासून आजतागायत ती अखंड चालू आहे आणि पुढे ही ती अशीच चालूही राहीलच. त्या धुनीतील जळलेल्या लाकडांची राख हे खरं तर तीच वरवरच दिसणार रूप.
पण बाबांच्या द्वारकामाईतल्या धुनीतील ती रक्षा, ती राख, ही राख नाही तर ती आहे उदी किंवा विभूती. राख ही पवित्र आणि वंदनीय मानली जात नाही. राख राखली जात नाही तर ती टाकून दिली जाते, पाण्यात विसर्जन केली जाते. पण उदी विभूती ही मोठ्या भक्तिभावाने आदराने मस्तकी धारण केली जाते. तिचे प्रसाद म्हणून सेवनही केले जाते.
बाबा लोकांना नेहमी सांगत की बाबांनो! या राखेकडे पाहून तरी तिच्या कडून काही तरी शिका रे. बाबांनो! हा मानवी देह हासुद्धा हाडांच्या रूपाने काष्ठाचाच आहे. तोसुद्धा शेवटी जळणार आहे आणि त्याचीही राख होणार आहे. या सत्याची तुमच्या मनास सदैव जागृती राहावी हाच या धुनीचा संदेश आहे.
“माझ्या द्वारकामाईतली ही धुनीतील रक्षा ही तुमचे सदैव रक्षण करणारी आहे. तिच्या लेपनाने तुमच्या मनोवृत्तीचा पालट होईल, आसक्त मन विवेक वैराग्य हे मनात जागून निवृत्त वैराग्ययुक्त होईल. तुमच्या मनातील भक्तिभावास विवेक आणि वैराग्याची जोड मिळाली तर तुमची ईश्वर साधना अधिक जोमाने होईल. त्यानेच तुमचे कल्याण होईल.’
हे आणि असे जे त्या वेळी बाबांनी सांगून ठेवले आहे ते खरे ही आहे. सिद्धसाधू, साधू आणि देवता ह्याच्या दारातील यज्ञ कुंडातील, धुनीतील विभूती ही आपले सर्वार्थाने रक्षण करते. ती आदराने माथी लावली तर तीच आपल्या सर्व आधिव्याधींचे निरसन करते. हा अनुभव ज्यांनी घेतलाय आणि जे घेतात त्यांनाच त्या राख आणि विभूती मधला नेमका फरक काय ते लक्षात येते.
अरुण गोखले