अरुण गोखले
ज्यांना जीवनाचे खरे मोल कळलेले असते अशा व्यक्ती सदैव आपल्या जीवनात सतर्क आणि जागरूक असतात. त्या आपल्या जीवनातली कोणतीच गोष्ट मग ते धन असो, वेळ असो, संधी असो वाया घालवत नाहीत. हर प्रयत्नाने त्याचे सार्थक करण्याचा प्रयत्न ते करीत असतात.
अनेकांना मात्र आपल्या जीवनाचे नेमके मोल काय आहे, नेमके तेच कळत नाही आणि जेव्हा ते जीवनाचे मोल कळते तेव्हा आपणच आपल्याजवळ किती अनमोल ठेवा ठेवला आहे, हे आजवर कसे जाणले नाही ह्याची खंत मनात टोचत राहते.
इथे एक छोटी पण आशयाने फार मोठी असलेली बोधपर कथा आठवते. एका नगरातून एक भिकारी अतिशय आर्त स्वरात एक गीत म्हणत चाललेला असतो. त्या गीताचा आशय असा असतो की, “देवा! अरे तू मला असा भिकारी, दरिद्री का ठेवलंस? तू इतरांना मात्र खूप काही दिलेस आणि मलाच असं का ठेवलंस? या माझ्या अशा दीनवाण्या जगण्याला काय मोल आहे.’
तेव्हा एक धनिक व्यक्ती त्या माणसाला आपल्याकडे बोलावून घेते आणि म्हणते, “तुला पैसे हवेत ना? तू असं कर, मला तुझे डोळे दे. मी तुला एक लाख रुपये देतो.’ तो भिकारी विचार करतो मी एक लाखासाठी जन्मभरासाठी मी आंधळेपण का विकत घेऊ? तो “नाही’ म्हणतो. धनिक म्हणतो, “मग कान दे.’ भिकारी त्यासही नाही म्हणतो. “मग पाय दे’. त्यासही तो भिकारी नाहीच म्हणतो. तो त्या एक लाखासाठी हात, पाय, डोळे, कान देण्यास तयार होत नाही.
तेव्हा तो धनिक त्याला म्हणतो की, “जर तुला देवाने दिलेल्या हातपाय, कानडोळे ह्यांचे इतके मोल वाटते, तर तू देवाने मला काहीच दिले नाही म्हणून का रडतोस? तुला जे देवाने दिले आहे त्याचा चांगला वापर कर ना. असं लाजिरवाणं झोळी घेऊन दारोदार का फिरतोस?’ते शब्द ऐकल्यावर भिकाऱ्यास आपल्या ईश्वरदत्त जीवनाचे खरे मोल कळते.
हे असंच आहे. आपल्याकडे जे आहे त्याचे मोल आपल्याला कळत नाही. ज्यांना कळते तेच प्रसंगी अपंगावरही मात करून नावाजणारे गायक, कलाकार, संगीतकार, खेळाडू, गिर्यारोहकही बनतात. ते प्राप्त जीवनाचे अर्थाने सार्थक करून सुखी होतात.