मुंबई : विरोधीपक्ष नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आपल्या नवीन गाण्याची घोषणा केली. मात्र अमृता यांनी घोषणा करत आपल्याला आणखी ट्रोल करा असे नेटकऱ्यांना म्हटले. दरम्यान, ट्रोलिंगचे आमंत्रण नेटकऱ्यांनी मनावर घेतल्याचे दिसत आहे. कारण येत्या गुरुवारी अमृता फडणवीस यांचे गाणं येणार असून ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी हे गाणं प्रकाशित केलं जाऊ नये अशी मागणी करणारी ऑनलाइन याचिकाच एका संकेतस्थळावर तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही तासांमध्ये ४०० हून अधिक जणांनी या ऑनलाइन याचिकेचे समर्थन केले आहे.
अमृता यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये येत्या गुरुवारी मी गायलेलं एक गाणं प्रदर्शित होत असून हे गाणं एका सस्पेन्स चित्रपटातील आहे असे सांगितले. तसेच हे येणारं नवीन गाणं हे प्रमोशनल साँग असून प्रत्यक्षात चित्रपटातही त्याचा वापर करण्यात आला आहे. हे गाणं एन्जॉय करा, ट्रोल करा पण नक्की पाहा असे आवाहनही अमृता यांनी केले. मात्र हे गाणे प्रदर्शित होण्याआधीच अमृता यांना ट्रोलर्सने पुन्हा लक्ष्य केले आहे.
हुनमंत ढोमे नावाच्या युझरने एका संकेतस्थळावर सोमवारी ‘पर्यावरणाचे सौरक्षण करण्यासाठी आणि ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी अमृता फडणवीस यांनी गाऊ नये,’ अशी ऑनलाइन याचिका दाखल केली आहे. या ऑनलाइन याचिकेच्या डिस्क्रिपप्शनमध्ये अमृता यांचा उल्लेख मामी असाही करण्यात आला आहे. “पुढच्या गुरुवारी मामींचे नवीन गाणे येणार आहे. या गाण्याने होणारे ध्वनिप्रदूषण माणसाला घातक ठरू शकते. हे गाणे त्यांनी रिलीज करू नये यासाठी आपण पेटीशन साइन करणे गरजेचे आहे,” असे या याचिकेच्या डिस्क्रिपप्शनमध्ये म्हटले आहे. तसेच पुढे, “आपला कान, आपली जबाबदारी” असेही लिहिण्यात आले आहे.
सोशल नेटवर्किंगवर प्रचंड अॅक्टीव्ह असणाऱ्या अमृता यांना ट्रोलिंगसंदर्भात मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना अमृता यांनी, “ट्विटर किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मत व्यक्त करतो तेव्हा त्याच्या बाजूने किंवा विरोधात बोलण्याचा हक्क असतो. तसा हक्क मी ही बजावते. अनेकदा मी माझी मत सोशल नेटवर्किंगवरुन मांडत असते. कधी मी ट्रोल होते तर कधी माझं कौतुक होतं. हे पार्ट अॅण्ड पार्सल ऑफ लाइफ आहे,” असे मत व्यक्त केले. ट्रोलिंग आणि टीका वाचून निराश व्हायला होतं का?, असा पुढचा प्रश्न अमृता यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना अमृता यांनी, “मी कानसेन पण आहे आणि थोडी तानसेन पण आहे. मी चांगल्या लेव्हलपर्यंत गाणं शिकलेलं आहे लहानपणापासून. त्यामुळे मला माझे प्लस पॉइण्ट काय आहेत आणि मायनस पॉइण्ट काय आहेत हे ठाऊक आहे. जे ट्रोलिंग होत आहे ते राजकीय दृष्ट्या केलं जात आहे की सामान्यांकडून केलं जात आहे हे मला ठाऊक आहे,” असं उत्तर दिलं.
“जेव्हा स्वत:वर एक विश्वास असतो तेव्हा आपल्याला ठाऊक असतं की आपण किती लायक आहोत. माझं अत्ताचं गाणं होतं ते सामाजिक गाणं होतं. स्त्रीभ्रूण हत्येसंदर्भात होतं. त्यावर काय प्रकारचं ट्रोलिंग झालं ते पाहिलं आपण. मला वाटतं की हे खरे लोकांचे, सामान्य लोकांचे विचार नाहीयत. मला वाटतं की मला तेवढी बुद्धी आहे. माझ्या आसपासच्यांना तेवढी बुद्धी आहे की ते मला डायरेक्ट करु शकतात तू बरोबर करते आहे की नाही. त्यांनीही मला म्हटलं की यात काहीही गैर नव्हतं आणि मी आतापर्यंत जे केलं त्यातही काहीही चुकीचं नव्हतं,” असेही अमृता फडणवीस म्हणाल्या.