मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आलेल्या धमक्यांच्या मुद्द्यावरुन राज्यात राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. आता या वादामध्ये उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची एन्ट्री झाली आहे. सोमवारी डोंबिवलीमध्ये नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात अमृता यांनी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर चांगलीच टीका केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमक्या येत असल्यावरुनच देशाची, राज्याची अवस्था बिघडलेली असल्याचं वाटतं, असं विधान यशोमती ठाकूर यांनी केले होते. या टीकेचा संदर्भ देत अमृता यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर अमृता यांनी, “धमक्या येणं देशाची अवस्था नाही सांगत. वेगळ्या दिमाख्यात असणाऱ्या लोकांची विचारसरणी यामधून दिसून येते. मला वाटतं त्यांच्यातलेच हे लोक असू शकतात, आपल्याला काय माहित?” असे म्हटले.
“मला वाटतं यातून देशाची काहीही व्यवस्था दिसत नाही. खराब लोकांच्या दिमाखाची (मेंदूची) व्यवस्था दिसून येते,” असा टोलाही अमृता यांनी लगावला. तसेच अमृता यांनी यापुढील प्रत्येक निवडणूक ही विकासाची असेल याच हेतूने भाजपा निवडणूक लढेल असा विश्वासही मुंबई महानगरपालिकेसंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना व्यक्त केला.