मुंबई – राज्यातील करोनामुळे बंद ठेवण्यात आलेली मंदिरे पुन्हा उघडली जावीत, अशी सुचना करणारे एक पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. तथापि त्या पत्रात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून काही आक्षेपार्ह प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांना सडेतोड उत्तर पाठवले आहे. माझ्या हिंदुत्वाला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हंटले आहे. आता यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
अमृता फडणवीस म्हणाल्या कि, वाह प्रशासन! बार आणि दारूची दुकाने सुरू आहेत. मग मंदिरे डेंजर झोनमध्ये आहेत का? नियमावली लागू करण्यात काही जण असमर्थ ठरतात, त्यांना त्यावेळी प्रमाणपत्राची आवश्यकता असते, असे म्हणत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. यावर आता शिवसेना नेमके काय उत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वाह प्रशासन – bars and liquor shops are wild wide open but temples are danger zones ?
Definitely sometimes ‘certificate’ is required to prove the saneness of some dicey creatures who are incapable of having SOPs in place ! 🤔🙄 #Maharashtra— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) October 13, 2020
दरम्यान, आपण सेक्युलर विचारसरणीचे सक्त विरोधक असताना तुम्ही अचानक सेक्युलर झाला आहात काय? बार आणि हॉटेल्स सुरू असताना मंदिरांवर बंदी का घालण्यात आली आहे? तुम्हाला काही विषयांबाबत काही दैवी संकेत येतात का? असे प्रश्न राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात उपस्थित केले होते.
त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकिस्तान व्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही. केवळ धर्मस्थळ उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे सेक्युलर असे आपले म्हणणे आहे काय असा सवालही उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना विचारला आहे. मग आपण राज्यपाल पदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतली आहे त्या घटनेचा गाभा सेक्युलर आहे हे आपल्याला मान्य नाही का? असेही मुख्यमंत्र्यांनी त्यांना विचारले होते.