प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 12 – शहराच्या स्वच्छतेची आणि पर्यावरणाची काळजी गेल्या 15 वर्षांपासून घेणाऱ्या कचरा वेचकांनी तिरंगा आणि संविधानाची मूल्ये जपत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला.
शहरात कचरा वेचकांना संविधान प्रस्ताविका घरी लावता यावी, यासाठी चार हजार संविधान प्रस्ताविकेच्या प्रतींचे वाटप केले. संपूर्ण शहरात, आपापल्या भागांमध्ये “स्वच्छ’च्या कचरा वेचकांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त एकत्र येऊन भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन केले.
देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झाली तरी कचरा वेचकांना मूलभूत हक्कांसाठी अजूनही लढा द्यावा लागतो. हे हक्क जपण्यासाठी कचरा वेचक नेहमीच एकत्र येतील आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवतील. आम्हाला बळ देणारा संविधानाचा आधारस्तंभ आम्ही नेहमीच साजरा करू. त्यामुळे तिरंग्यासोबत ज्या संविधानिक मूल्यांमुळे आम्हा “स्वच्छ’च्या 3 हजार 800 कचरावेचक बंधूभगिनींचे आयुष्य बदलले, ती मूल्ये स्मरून आम्ही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला, असे स्वच्छ सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षा सुमन मोरे यांनी सांगितले.
स्वातंत्र्यलढ्यात तिरंगा हातात घेऊन जे शहीद झाले, ज्यांनी लाठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला त्यांनी उद्याच्या भारताबद्दल एक स्वप्न पाहिले होते. तो भारत जातीभेदाला गाडणारा, धर्मद्वेषाला नाकारणारा, महिलांना सार्वजनिक जीवनात सक्रिय होण्यासाठी प्रोत्साहन देणारा आणि सर्वांना सन्मानाची हमी आणि विकासाची समान संधी देणारा बनावा, हे स्वप्न त्यांनी पाहिले होते. हेच स्वप्न संविधाननिर्मात्यांनी संविधानाद्वारे भारतीयांसमोर ठेवले आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राष्ट्रध्वजाला अभिवादन करताना या स्वप्नाचा ध्यास आपण घेऊया, असे मत सुभाष वारे यांनी व्यक्त केले