अमरावती : अतिवृष्टीमुळे घरांची पडझड होऊन नुकसान झालेल्या अमरावती व भातकुली तहसीलमधील २२ लाभार्थ्यांना राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्यांना मदत मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, असे पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
अमरावती तालुक्यातील २१ लाभार्थी व पूर्णानगर येथील एका लाभार्थ्याला पालकमंत्री ॲड. ठाकूर यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप शासकीय विश्रामगृह येथे आज करण्यात आले.
भातकुली तालुक्यातील पूर्णानगर येथील एका लाभार्थ्यासह अमरावती तहसीलमधील थुगाव,खानापूर,यावली, कठोरा गांधी, ब्राम्हणवाडा, आणि गोविंदपूर येथील 21 लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.जि. प. चे माजी सभापती जयंतराव देशमुख, हरीभाऊ मोहोड, तालुका प्रशासनाचे अधिकारी व विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.
वलगाव-दर्यापूर रस्त्याबाबत पालकमंत्र्यांकडून आढावा
वलगाव- दर्यापूर रस्त्याचा विकास होत असताना गावांना अप्रोच रोडसह संपूर्ण रस्त्याची नियोजित कामे गुणवत्तापूर्ण व विहित मुदतीत पूर्ण करावीत, असे सुस्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.