राज्यातील 12 शहरांमध्ये भूखंड उपलब्ध करण्याची “एमआयडीसी’कडे मागणी
– तुषार रंधवे
पुणे – अमेरिकेतील सुपर स्टोअर मॉल शृंखला वॉलमार्ट कंपनीने आता राज्यात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. कंपनीने औरंगाबाद आणि अमरावतीत सुपर मॉल सुरू केल्यानंतर आता आपला मोर्चा महानगरांकडे वळवला आहे. कंपनीचा विस्तार करताना नवीन स्टोअर्स उभारण्यासाठी पुणे-मुंबईसह राज्यातील 12 शहरांमध्ये भूखंड उपलब्ध करुन देण्याची मागणी “एमआयडीसी’ अर्थात महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाकडे केली आहे.
सध्या भारतात डी-मार्ट, बिग बाजार, मोर, रिलायन्स फ्रेश, स्टार बाजार या कंपन्यांचे सुपरमार्केट मॉल्स आहेत. त्यामध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करत बाजारपेठ बऱ्यापैकी काबीज केली आहे. अगदी अन्न-धान्यापासून दुधापर्यंतच्या विविध ब्रॅन्डच्या असंख्य वस्तू या सुपरमार्केटमध्ये छापील किंमतीपेक्षा कमी दरात उपलब्ध होत आहेत. त्यामुळे शहरातील ग्राहक या सुपर मॉल्समधील खरेदीला प्राधान्य देतात. या सर्व कंपन्यांना टक्कर देण्यासाठी अमेरिकेतील बलाढ्य सुपर स्टोअर मॉल शृंखला असलेल्या वॉलमार्टने देशातील जम्मू-काश्मीर, पंजाब, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांमध्ये एकूण 28 सुपर स्टोअर्स सुरू केली आहेत. तर, महाराष्ट्राच्या व्यापारी क्षेत्रात चंचुप्रवेश केला आहे. या कंपनीच्या प्रवेशामुळे आता सुपर मॉल मार्केट क्षेत्रातील अन्य कंपन्यांसमोर तगडे आव्हान निर्माण होणार आहे.
व्यापाऱ्यांचा विरोध कायम
वॉलमार्टमध्ये 100 टक्के थेट परकीय गुंतवणूक असल्याने भारतातील सुमारे 10 लाख किरकोळ व्यापारी संपतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. गतवर्षी जुलै महिन्यात कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या दिल्लीतील अधिवेशनात या कंपनीच्या गुंतवणुकीला मोठा विरोध करण्यात आला होता. त्यामुळे या कंपनीच्या विस्ताराला देशभरातील व्यापाऱ्यांकडून विरोध होत असतानादेखील, ही कंपनी आता हळूहळू देशभरात पाय रोवू लागली आहे. व्यापाऱ्यांच्या विरोधाची त्यावेळी मोठी चर्चा झाली होती. अगोदरच ऑनलाइन विक्री क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक परदेशी कंपन्यांकडून व्यवसायात मोठी घट झाली आहे. आता वॉलमार्टच्या माध्यमातून त्यामध्ये आणखी भर पडणार आहे.