कोलकाता : अम्फान वादळामुळे पश्चिम बंगालमध्ये 72 जण मरण पावले आहेत. कोलकात्यात 15, उत्तर 24 परगण्यात 18 जण दक्षिण 24 परगण्यात 17 जण, हावड्यात सात तर पूर्व मदिनापूरमध्ये सहा जण मरण पावले आहेत. हुगलीमध्ये दोन जणांचे बळी पडले आहेत, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
या वादळात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रूपयांची मदत बॅनर्जी यांनी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: येऊन राज्यातील नुकसानीची पहाणी करावी, असे आव्हान त्यांनी दिले.
अजूनही राज्यातील स्थिती सावरली नसून पंतप्रधानांनी पहाणी करावी, असे मी आवाहन करत आहे. मलाही या क्षेत्राची हवाई पहाणी करायची आहे. मात्र हवामान अद्याप सुधारले नसल्याने ते शक्य नाही, असे त्या म्हणाल्या.
वनविभागाने केलेल्या वृक्षलागवडीची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. सुंदरबनमधील खारफुटीला मोठा फटका बसला आहे. त्याचे संरक्षण करण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय हवामान खात्याच्या भारतीय हवामान खात्याच्या अहवालानुसार कोलकात्यात वाऱ्याचा वेग ताशी 130 होता. तर सुमारे 200 मिमि पाऊस शहरात नोंदवला गेला.