जळगाव – यंदा पायी वारीला परवानगी दिली असती तर बरे झाले असते. जशी बसने वारी करण्यास परवानगी दिली तसे कमी संख्येत पायी वारी करायला परवानगी द्यायला हरकत नव्हती असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या भूमिकेने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
संत मुक्ताई संस्थानच्या संत मुक्ताईंची पालखीमध्ये हजारो दिंड्या पालख्या आणि वारकरी मोठ्या भक्ती भावाने सहभागी होत असतात. मात्र गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारीवर बंधन आले असून त्याऐवजी मोजक्याच 100 वारकऱ्यांसह ही वारी बसमधून पंढरपूरकडे रवाना केली जात आहे.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर तालुक्यातील कोथळी या गावी असलेल्या संत मुक्ताबाई समाधी स्थळवरून संत मुक्ताबाईंची मानाची पालखी पंढरपूरकडे रवाना होत असते अतिशय मानाच्या असलेल्या या पालखीचा साडेसातशे किलोमीटर चा प्रवास 34 दिवसांत पूर्ण होत असतो. यमात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही मुक्ताई पालखीला पायी जाण्यास परवानगी मिळाली नसली तरी वारीला खंड पडू नये म्हणून शंभर वारकऱ्यांच्या मध्ये बसमधून ही वारी नेण्यास परवानगी देण्यात आली आहे.
बसने कमी लोकांत परवानगी दिली जाते तशी पायी जाताना सुद्धा कमी लोकांमध्ये शासनाने परवानगी द्यायला हवी होती, अशी मागणी वारकऱ्यांची होती असा प्रस्ताव ही वारकऱ्यांच्या वतीने शासनास देण्यात आला होता मात्र त्यास परवानगी मिळाली नाही. मुक्ताई नगर येथून निघणाऱ्या संत मुक्ताबाई वारीची अनेक वर्षांची परंपरा पाहता आणि वारकऱ्यांची मागणी पाहता वारकऱ्यांच्या हा प्रस्ताव शासनाने मंजूर केला असता तर अधिक बरे झाले असते, अशी भूमिका खडसे यांनी मांडली.