मुंबई – गेल्या काही दिवसांपासून बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज चांगलेच चर्चेत आहेत. सुरुवातीला धीरेंद्र शास्त्री यांना मिळालेल्या आव्हानामुळे ते चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा संत तुकाराम महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे शास्त्री चर्चेत आले आहेत. ‘संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची’ असं विधान शास्त्रींनीं केल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. शास्त्री जिथं दिसतील तिथं त्यांना ठोका अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केला आहे.
एका वृत्त वाहिनीशी बोलताना मिटकरी यांनी बागेश्वर महाराजांनी केलेल्या वक्तव्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. मिटकरी यांनी तुकोबांच्याच काही अभंगांचे दाखले देत धीरेंद्र शास्त्रींवर शरसंधान साधले आहे. बागेश्वर महाराजांना वारकरी संप्रदाय म्हणजे काय ? हे माहिती नाही त्यांनी केलेलं विधान चुकीचे आहे त्यामुळे धीरेंद्र शास्त्री जिथं दिसतील तिथं वारकरी संप्रदायाने त्यांना ठोका असा इशाराच मिटकरांनी यावेळी दिला आहे.
पळपुटा आणि अक्कलशून्य असलेला बागेश्वर बाबा, त्याला श्याम मानव यांनी ४० लाखांचं बक्षिस जाहीर केलं होतं. तोच बागेश्वर आज संत तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नीवर बोलतो आहे. वारकरी संप्रदायाने याची गंभीर दखल घ्यायला हवी असंही मिटकरी यावेळी म्हणालेत. तसेच ‘तुका म्हणे गाढव लेका जिथे दिसले तिथे ठोका’ हा जिथे दिसेल तिथे याला ठोकला पाहिजे असं मिटकरी यावेळी म्हणाले.
काय म्हणले होते धीरेंद्र शास्त्री
बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज नेमकं काय म्हणाले…
“संत तुकाराम महाराज महाराष्ट्रातील एक महात्मा आहेत. त्यांची पत्नी त्यांना रोज मारायची. याच कारणामुळे त्यांना एका व्यक्तीने विचारले की तुमची पत्नी तुम्हाला रोज मारहाण करते, मग तुम्हाला वाईट वाटत नाही का? यावर तुकोबा म्हणाले की, ‘देवाची कृपा आहे की मला मारहाण करणारी पत्नी मिळाली. माझ्या पत्नीने माझ्यावर प्रेम केले असते तर मी देवाच्या प्रेमात पडलोच नसतो. मी पत्नीच्याच प्रेमात गुरफटून गेलो असतो. मला मारहाण करणारी बायको मिळाली आहे, त्यामुळे मला प्रभू राम यांची भक्ती करण्याची संधी मिळते, असे संत तुकाराम महाराज म्हणाले होते’. असे धीरेंद्र कृष्ण महाराज म्हणाले.