मुंबई – शिरुर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटात केलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेवरून सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. अनेकांनी या भूमिकेला विरोध दर्शवला आहे. त्यातच आता काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमोल कोल्हेंचा हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
नाना पटोले म्हणाले, अमोल कोल्हे आता कलाकार नाहीत तर लोकप्रतिनिधी आहेत. गोडसे विचाराला ताकद मिळणे म्हणजे देशविघातक विचारांना ताकद मिळण्यासारखे आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीला कोणीही ताकद देवू नये, त्यांना हिरो बनवू नये. या देशाला गांधी विचारच तारू शकतात. याच विचारांवर देश महासत्ता होवू शकतो. त्यामुळे या वादात शरद पवारांनी यात लक्ष घालावे. जर चित्रपट प्रदर्शित झाला तर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका दिसून येईल, असेही पटोले म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कोल्हेंच्या या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले, ”अमोल कोल्हे यांच्या भूमिकेकडे कलाकार म्हणून पाहिले पाहिजे. रामराज्य सिनेमा असेल यामध्ये रावणाची भूमिका करणारी व्यक्ती ही रावण असू शकत नाही. सीतेचं त्याने अपहरण केलं म्हणजे त्या कलाकाराने अपहरण केलं असं होत नाही. अमोल कोल्हे आमच्या पक्षात नवीन आहेत. कलावंत म्हणून त्यांनी भूमिका केली असेल तरी ते गांधी विरोधी आहेत, असा त्याचा अर्थ होत नाही. नथुरामचे महत्व वाढवायचा कोणताही प्रयत्न नाही. कलावंत म्हणून मी कोणत्याही कलावंताचा सन्मान करतो, असे पवार म्हणाले.