मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांनंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. विरोधकांकडून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत. बलात्कार प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेतेही मुंडे यांना पाठिंबा देताना दिसत नाही. मात्र खासदार अमोल कोल्हे यांनी मुंडे यांच्या मदतीला धावून येत, विरोधकांवर जोरदार टीका केली.
आमच्याकडून नैतिकतेची अपेक्षा करणाऱ्या विरोधकांनी सत्तेत असताना किती नैतिकता पाळली होती ? असा सवाल खासदार कोल्हे यांनी केला. तसेच विरोधकांनी आधी स्वत:ला आरशात पाहावे, अशी घणाघाती टीकाही अमोल कोल्हे यांनी केली.
तत्पूर्वी बलात्काराचे आरोप झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी सोशल मीडियावर आपली बाजू मांडली. ते म्हणाले की, माझ्यावर करण्यात येत असलेले बलात्काराचे आरोप खोटे, माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे आहे. करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. दोन्ही मुलांना मी माझे नाव दिल्याचेही मुंडे यांनी नमूद केले होते.
या सर्व प्रकरणावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार किरीट सोमय्या आणि महिला नेत्या चित्रा वाघ यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.