पुणे – सव्वा सहा वर्षांपूर्वी टोळीच्या वर्चस्वातून नीलेश घायवळ टोळीतील अमोल बधे याचा नवी पेठेत गोळ्या घालून खून केल्याप्रकरणात कुख्यात गजानन मारणे (वय 49, रा. कोथरूड) याच्यासह 22 जणांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता झाली. विशेष मोक्का न्यायाधीश ए.वाय.थत्ते यांनी हा आदेश दिला. 29 नोव्हेंबर 2014 रोजी दुपारी 4.15 च्या सुमारास ही घटना घडली होती.
या प्रकरणात बचाव पक्षातर्फे ऍड. सुधीर शहा, ऍड. विजयसिंह ठोंबरे, ऍड. विपुल दुशिंग, ऍड. सिध्दार्थ पाटील, ऍड. जितंद्र सावंत आणि ऍड राहुल भरेकर यांनी काम पाहिले. तर फिर्यादी संतोष कांबळे हा गुन्ह्यात जखमी झाला होता. मयत अमोल आणि संतोष हे घायवळ टोळीचे आहेत.
घायवळ आणि मारणे टोळीत वैमनस्य आहे. घायवळ टोळीच्या सचिन कुडले याचा खून झाला होता. त्यामध्ये फिर्यादी व मयत दोघेही आरोपी होते. ते दोघे जामिनावर असताना वर्चस्व आणि सचिन कुडले याच्या खूनाचा बदल घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.