हवेत घटकाच्या प्रमाणात धोकादायक पातळीपर्यंत वाढ
आयआयटीएम आणि आयआयटी खरगपूर संस्थांकडून संशोधन
पुणे – वनस्पतींमधील उत्पादनक्षमता कमी करण्याबरोबरच मानवी आरोग्याला हानिकारक अमोनिया प्रदूषण हे शास्रज्ञांसमोरील मोठे आव्हान ठरत आहे. देशभरातील हवेत विशेषत: मध्य आणि उत्तर भारतीय राज्यांमधील वातावरणात अमोनिया या घटकाचे प्रमाण धोकादायक पातळीपर्यंत वाढत आहे. प्रामुख्याने रासायनिक खतांचा वापर, मृत प्राण्यांची योग्य विल्हेवाट न लावणे आणि कचरा जाळणे हे यामागील प्रमुख कारण असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.
पुण्यातील भारतीय उष्णकटीबंधीय हवामान संस्था (आयआयटीएम) आणि आयआयटी खरगपूर या दोन्ही संस्थेतील शास्रज्ञांच्या संयुक्त संशोधनातून ही बाब समोर आली. यासंदर्भातील संशोधन नुकतेच “सायन्स ऑफ टोटल एन्व्हारयमेंट’ या नियतकालिकात प्रकाशित झाले. 2008 ते 2016 या कालावधीत झालेल्या संशोधन प्रकल्पासाठी केंद्रीय पृथ्वी-विज्ञान मंत्रालयातर्फे अंशत: निधी देण्यात आला होता.
संशोधनाचे प्रमुख समन्वयक आणि आयआयटी खरगपूर येथील सहायक प्राध्यापक जयनारायण कुट्टीपुरूथ म्हणाले, “सुमारे आठ वर्षे सुरू असलेल्या या प्रकल्पांतर्गत देशभरातील जवळपास सर्वच राज्यांमधील वातावरणाचा अभ्यास झाला.
यासाठी इन्फ्रारेड ऍटमॉसफेरिक साऊंडिंग इंटरफेरोमीटर (आयएएसआय) हे सॅटेलाइट आधारित उपकरण वापरले. यामाध्यमातून भू-पृष्ठ भागातून हवेत उत्सर्जित होणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक उत्सर्जित किरणांचे विश्लेषण केले जाते. यातून समोर आलेल्या माहितीनुसार, मध्य आणि उत्तर भारतीय राज्यांमधील वातावरणात अमोनिया या घटकाचे प्रमाण धोकादायक पातळीपर्यंत वाढत आहे. विशेषत: 2010 साली ते सर्वाधिक धोकादायक पातळीवर होते.
प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब आणि हरयाणा या राज्यांमध्ये हे प्रमाण अधिक असून, या भागात शेतीचे प्रमाण अधिक आहे. मध्य भारतातही या अमोनिया प्रदूषणाचे प्रमाण धोकादायक पातळीवर आहे. तुलनेत दक्षिण भारतीय राज्यांमध्ये हे प्रमाण कमी असल्याचेही या संशोधनात नोंदविण्यात आले आहे.’
प्रदूषणाचे दुष्परिणाम
– अतिरिक्त अमोनियामुळे वनस्पतींमधील उत्पादन क्षमता कमी
– अधिक काळ या हवेच्या संपर्कात आल्याने मानवी आरोग्यावर घातक परिणाम
– त्वचा, डोळे आणि घसा जळजळणे अशा समस्या उद्भवतात
– फुप्फुसांचे विकार संभवतात