गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं स्पष्टीकरण
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती वाधवान यांना लॉकडाउन दरम्यान प्रवासासाठी विशेष परवानगीचे पत्र कोणाच्याही दबावाविना आपणच दिल्याचे सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले गृह विभागाचे मुख्य सचिव अमिताभ गुप्ता यांनी कबूल केले आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. या प्रकरणाचा चौकशी अहवाल आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
देशमुख म्हणाले, “या सर्व प्रकरणामध्ये अमिताभ गुप्ता यांच्या चौकशीसाठी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी केलेल्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार लॉकडाउनच्या काळात वाधवान कुटुंबियांना मुंबईहून महाबळेश्वर जाण्यासाठी मंत्रालयातून जे पत्र देण्यात आलं होतं, स्वतः आपणच दिल्याचं अमिताभ गुप्ता यांनी कबूल केलं आहे. हे देताना त्यांच्यावर कुणाचाही दबाव नव्हता असही त्यांनी चौकशीत म्हटलं आहे.”