मुंबई- गंभीर आजाराच्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना रेल्वेने लोकल प्रवासासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी मनसे नेते अमित ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देत ही मागणी केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यात मुंबईची लाइफलाईन असलेली लोकलसुद्धा बंद करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी अनलाॅक मिशन बिगीन अगेनची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी अत्यावश्यक सुविधांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु करण्यात आली होती. मात्र आता मुंबईतील जनतेचा प्रवासासाठी होणारी वाईट परिस्थिती पाहुन अमित ठाकरे यांनी ही मागणी केली आहे.
‘गेल्या सहा महिन्यांच्या करोना लॉकडाऊनच्या काळात क्षयरोग, कर्करोग, यकृत, मूत्रपिंड, मेंदूविकार, अर्धांगवायू, मधुमेहासारख्या गंभीर आजारानं त्रस्त असणाऱ्या रुग्णांना उपचार घेण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. सहा महिन्यांत सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. अशातच या आजारांवरील उपचारांचा खर्च लाखोंच्या घरात असतो. सध्या रुग्णांना उपचाराबरोबर प्रवास खर्चाला तोंड द्यावे लागत आहे,’ असं अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.
गंभीर आजाराच्या वैद्यकीय उपचारासाठी प्रवास कराव्या लागणाऱ्या रुग्णांना आणि त्यासारख्या नातेवाईकांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी; मनसे नेते श्री. अमित ठाकरे ह्यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी.@CMOMaharashtra @Central_Railway @WesternRly pic.twitter.com/XfSOESnfSx
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 4, 2020
‘असे अनेक आजार आहेत ज्यांच्या उपचारासाठी रुग्णांना आठवड्यातून दोन-तीन वेळा प्रवास करावा लागतो. सध्याची बिघडलेली आर्थिक परिस्थिती पाहता बहुतांश रुग्णांना खासगी वाहनानं प्रवास परवडत नाही. या खर्चामुळं अनेक रुग्ण उपचारांपासून वंचित राहत आहेत. त्यामुळं अशा रुग्णांचा मृत्यू दर करोनामुळं होणाऱ्या मृत्यूंपेक्षा अधिक होत चालला आहे, तसंच, गंभीर आजार असलेल्या रुग्णांना त्याच्या उपचारादरम्यान आधारासाठी सोबत नातेवाईकाची गरज असते. अशावेळी रुग्णांना व त्याच्या नातेवाईकांना उपचारादरम्यान खासगी वाहनाने प्रवास परवडणं शक्य नसल्यानं त्यांना रेल्वेनं प्रवासासाठी मुभा देणं गरजेचं आहे,’ असं देखील या पत्रात म्हटलं आहे.