मुंबई – पर्यावरणाचा ऱ्हास करून होणारी प्रगती मान्य होणारी नसल्याने आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथील सरकारी जमिनीवर करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केली होती.
मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला विरोधकांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारने हा निर्णय अहंकारातून घेतला असल्याची टीका करत यामुळे ४००० कोटींचे नुकसान होईल असा आरोप केला आहे.
दरम्यान, या मुद्द्यावरून भाजप महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा तयारीत असतानाच मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे ठाकरे सरकारच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. याबाबतची भूमिका मांडताना अमित ठाकरे यांनी फडणवीसांना नाव न घेता टोलाही लगावला आहे.
अमित ठाकरे यांची भूमिका मनसेच्या अधिकृत ट्विटर खात्यावर मांडण्यात आली आहे. मनसेच्या ट्विटर हँडलवर याबाबतचा एक फोटो शेअर करण्यात आला असून यामध्ये सुरुवातीला, ‘मेट्रो कारशेड ‘आरे’तून हटवल्यानंतर आर्थिक नुकसान होईल असे आरोप करण्यात येत आहेत, अमित ठाकरेंना काय वाटतं?’ असा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्याखालोखाल अमित ठाकरेंची भूमिका मांडण्यात आली आहे.
काय आहे अमित ठाकरेंची भूमिका?
“मुंबईचं आणि भवी पिढीसाठी गरजेचं असलेल्या पर्यावरणाचं नुकसान होण्यापेक्षा कारशेडचं नुकसान झालेलं परवडलं,” अशी भूमिका अमित ठाकरे यांनी मांडली आहे.
#मुंबईचंफुफ्फस #आरेवन #पर्यावरणप्रेमी #अमितठाकरे pic.twitter.com/djRAsn16VC
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 12, 2020
काय म्हणाले फडणवीस?
आरे कारशेड कांजूरमार्गला हलवण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली. सरकारने हा निर्णय अहंकारातून घेतल्याचेही ते म्हणाले.