यापुढे 100 दिवस कुटुंबासोबत जवानांना घालवता येणार वेळ
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि आसाम रायफल्सच्या महासंचालकांना एक महत्वाचा आदेश दिला आहे. सीआरपीएफच्या जवानांना कमीत कमी 100 दिवस आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवता येईल अशापद्धतीने त्यांची नियुक्त करा असे शहा यांनी सांगितले आहे.
सीआरपीएफने दिलेल्या माहितीनुसार सीआरपीएफच्या जवानांना अंदाजे आपल्या कुटुंबाबरोबर 75 ते 80 दिवस मिळतात. यामध्ये 60 पगारी रजा आणि 15 कॅज्यूअल लिव्ह्सचा समावेश आहे. तसेच पहिल्या दोन मुलांच्या जन्मासाठी जवानांना 15 दिवसांची पॅटर्नल लिव्ह (पालकत्वासाठी रजा) मिळण्याची तरतूद आहे.
शहा यांनी दिलेल्या सूचना अंमलात आणल्यास जवानांना त्यांच्या कुटुंबांबरोबर अधिक वेळ घालवता येईल. यामुळे जवानांना खूप फायदा होणार असून त्यांना अनेक कौटुंबिक समारंभांना उपस्थित राहता येणार आहे.
तसेच या निर्णयामुळे जवानांना प्रेरणा मिळेल आणि सरकार आपल्याबद्दल विचार करत आहे अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होईल, असे मत एका अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.