कलम 370 पुन्हा लागू करण्याची घोषणा करून दाखवा !
नवापुर (महाराष्ट्र) – जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय मागे घेऊन सत्तेवर आल्यास हे कलम पुन्हा लागू करण्याची घोषणा राहुल गांधी यांनी करून दाखवावी असे आव्हान गृहमंत्री व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांना दिले आहे.
आज नंदुरबार जिल्ह्यातील नवापुर या अदिवासी भागात घेतलेल्या एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी हे आव्हान दिले. ते म्हणाले की मोदींना दुसऱ्यांदा जनादेश मिळाल्यानंतर त्यांनी कलम 370 रद्द करण्याचे महत्वाचे काम तातडीने पुर्ण करून दाखवले. हे कलम तेथे लावण्यात आल्याचा लाभ पाकिस्तानने उठवला.
त्यांच्या पाठिंब्यावर तेथे सुरू असलेल्या दहशतवादाने चाळीस हजार लोकांचे बळी घेतले. पण कॉंग्रेसला त्याची फिकीर नव्हती. राष्ट्रहित त्यांच्या डोक्यातच नाही. त्यांना केवळ वोट बॅंकेचेच राजकारण करायचे आहे असे ते म्हणाले.
महाराष्ट्राचा आणि कलम 370 चा संबंध काय अशी विचारणा राहुल गांधी हे करीत आहेत. पण हे कलम आपण पुन्हा लागू करू अशी ग्वाही ते देऊ शकतात काय असा सवाल त्यांनी केला.