मुंबई : रापज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पहिल्यांदाच मुंबईच्या दौऱ्यावर येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या 30 ऑक्टोबर रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईत होणाऱ्या भाजप आमदारांच्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. भाजपचे प्रवक्ते गिरीश व्यास यांनी नागपूर येथे ही माहिती दिली. या दौऱ्या दरम्यान अमित शहा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरुन सुरु असलेल्या वादासंदर्भात ते उध्दव ठाकरेंशी चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप युतीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. आता राज्यात सत्ता स्थापनेसाठी जोरदार प्रयत्न सुरु झाले आहे. दरम्यान, शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदावरुन छुपेयुध्द सुरु झाले आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने समसमान जागावाटप आणि सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला होता. त्या प्रमाणेच आता शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद दिले जावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. तर पुढील पाच वर्षे भाजपच्या नेतृत्वाखालीच राज्यात महायुतीचं सरकार काम करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.