नवी दिल्ली – दिल्लीत झालेल्या दंगलीची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. दिल्लीत या दंगली घडत होत्या त्यावेळी शहा नेमके काय करीत होते असा सवालही सोनियांनी विचारला आहे.
दिल्लीतील परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे निदर्शनाला आल्यानंतर लगेचच तेथे निमलष्करी दलांना का पाचारण करण्यात आले नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. कॉंग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हे प्रश्न उपस्थित केले.
दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला गृहमंत्री आणि केंद्र सरकार जबाबदार असून गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणीही सोनियांनी केली. दिल्लीत गेले तीन दिवस विविध भागांमध्ये मोठा हिंसाचार झाला असून दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था स्थिती हा केंद्र सरकारचा विषय आहे त्यांच्यावरच याची जबाबदारी आहे. ती त्यांनी समर्थपणे पार पाडली नाही असाही आरोप यावेळी करण्यात आला. दिल्ली सरकारवरही सोनिया गांधी यांनी ताशेरे मारले.