श्रीनगर – बर्फवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग गेल्या काहीं दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे काश्मीरच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे इंधनाचे काश्मीर खोऱ्यात रेशनिंग करावे लागले आहे.
तेथील नागरीकांना आता कमी प्रमाणातच इंधन पुरवले जात आहे. काश्मीरच्या विभागीय आयुक्तांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार मालवाहू वाहनांना केवळ 20 लीटरच इंधन पुरवण्याची सूचना करण्यात आली आहे. तीन चाकी वाहनांना पाच लिटर आणि दुचाकी वाहनांना तीन लिटर या प्रमाणात इंधन पुरवठा करण्यास सांगण्यात आले आहे.
एलपीजी गॅस सिलिंडरच्या वापरावरही निर्बंध लागू करण्यात आले असून 21 दिवस झाल्याशिवाय गॅस सिलिंडर भरून मिळणार नाही असा फतवा तेथे जारी करण्यात आला आहे. या रेशनिंगच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा काळाबाजार होणार नाही याची जातीने लक्ष घालून दक्षता घ्या अशी सुचना सर्व पुरवठा अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.