पुणे – पश्चिम घाटासह देशातील सर्वच व्याघ्रप्रकल्पांमध्ये लटाना कॅमारा म्हणजेच टणटणी या वनस्पतीने संरक्षित प्रदेशातील तब्बल 40 टक्क्यांहून अधिक प्रदेशात फोफावली आहे. परदेशी प्रजातीच्या या वनस्पतीच्या अतिक्रमणामुळे स्थानिक वनस्पती नष्ट होत आहे. या वनस्पतीवर अवलंबून असलेल्या तृणभक्षी प्राण्यांसमोर अन्नाचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यातूनच देशातील विविध भागांमध्ये मानव- वन्यजीव संघर्ष वाढत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.
ब्रिटिशकाळात उद्यानांच्या सुशोभिकरणासाठी भारतात आणली गेलेली टणटणी आता उद्यानांच्या बाहेर पडून, देशातील संरक्षित वनांमध्ये तसेच बिगर संरक्षित प्रदेशात फोफावत आहे. अमेरिकन मूळची ही वनस्पती स्थानिक जैवविविधतेसाठी घातक असून, त्यामुळे स्थानिक वनस्पती मोठ्या प्रमाणावर नष्ट होत आहेत.
पश्चिम घाटासहित मध्य भारत, हिमाचल प्रदेश, दक्षिणेतील राज्ये या भागांमध्ये टणटणीने अतिक्रमण केले आहे. देशभरातील व्याघ्रप्रकल्पांमध्ये या वनस्पतीचे अस्तित्व धोकादायकरित्या वाढत आहे. देशात 1 लाख 54 हजार 837 चौरस किलोमीटर क्षेत्रावर या वनस्पतीने अतिक्रमण केल्याची माहिती ग्लोबल इकोलॉजी ऍन्ड कन्झर्वेशन रिपोर्टमध्ये प्रकाशित अभ्यासातून समोर आली आहे.
परदेशी आगंतुक प्रजातील वनस्पती असलेल्या तणतणीमुळे प्राण्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याचे अभ्यासात नमूद केले आहे. यामध्ये प्राण्यांमध्ये विविध ऍलर्जी निर्माण होणे, टणटणीच्या अतिसेवनामुळे डायरिया, लिव्हर फेल्युअर यासारखे विकार तसेच काही प्रमाणात प्राणी दगावल्याच्याही घटना घडतात.
व्यवस्थापनाचे अर्थकारण
टणटणी काढण्यासाठी स्थानिक वनविभागातर्फे कंत्राटी कामगार नेमले जातात. साधारण उन्हाळ्यात ही कामे केली जातात. मात्र, यासाठी कामगारांना चांगले वेतन मिळत नसल्याने त्याबाबत उदासीनता दिसून येते. तसेच, अभ्यासानुसार एका चौरस किलोमीटर क्षेत्रातील वनस्पती समूळ नष्ट करण्यासाठी तब्बल 14 लाख रुपये खर्च येतो. वनस्पतीचा सध्याचा विस्तार पाहता, पूर्णपणे ती नष्ट करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल विभागाने 2019 मध्ये मंजूर केलेल्या निधीच्या तब्बल 10 अब्ज रुपये अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे.