वॉशिंग्टन – विस्तारवादी धोरणे राबविणारा चीन सगळीकडे अगळीक करतो आहे. आपल्या प्रत्येक शेजारी देशाशी त्यांनी सीमा वाद उकरून काढला आहे. लडाख भागात तर चीन आणि भारत तणाव शिगेला पोहोचला आहे. त्यातच चीनने पुन्हा दर्पोक्ती केली आहे. केवळ लडाखच नव्हे, तर अरूणाचल प्रदेश हा भागही वादग्रस्त असल्याचे चीनचे म्हणणे आहे. मात्र त्यांच्या या दाव्याला अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने वेळीच खोडून काढले आहे.
अरूणाचल प्रदेश भारताचाच भाग आहे. गेल्या 60 वर्षांपासून अमेरिकेची ही भूमिका आहे व त्यात आता कोणताही बदल झाला नसल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
गेल्या सहा दशकांपासून आम्ही अरूणाचल प्रदेशाला भारताचा भाग मानत आलो आहेत. लष्कर अथवा नागरी घुसखोरीच्या माध्यमातून येथे कोणी एकतर्फी बदल करण्याचा कोणता प्रयत्न केला तर तो आम्हाला अमान्य असेल असेही अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
चीनने नेहमीच प्रत्येक शेजारी राष्ट्रासोबत आक्रमकपणा दाखवला आहे, दादागिरी करण्याचा प्रयत्न केला आहे. इतकेच काय आपल्या स्वत:च्या नागरिकांसोबतही त्यांनी दडपशाही केली आहे. गेल्या बऱ्याच काळापासून भारताला चीनच्या या आक्रमक आणि मुजोरपणाचा जाच सहन करावा लागला आहे. त्यामुळे यापुढच्या काळातही अमेरिकेकडून भारताला दिले जाणारे लष्करी सहकार्य कायम राहणार असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
भारताला विविध आघाड्यांवर सातत्याने आव्हानांचा मुकाबला करावा लागतो आहे. अशा काळात भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण भागिदारीला अनन्यसाधारण महत्व आहे असे त्या देशाने नमूद केले आहे.