नवी दिल्ली – भारतातील अदानी उद्योग समुहाने शेअर बाजारात हातचलाखी करून आपल्या कंपन्यांचे शेअर्सचे भाव कृत्रिमरित्या वाढवून घेऊन गुंतवणुकदारांची फसवणूक केली आहे. तसेच या वाढीव भावाच्या शेअर्सच्या आधारे त्यांनी प्रचंड मोठे कर्ज घेऊनही मोठाच घोटाळा केला आहे असा दावा हिंडेनबर्ग इन्व्हेस्ट रिसर्च संस्थेने केला आहे. गेली दोन वर्षे हजारो कागदपत्रे आणि असंख्य व्यवहार तपासल्यानंतर हा घोटाळा आम्ही उजेडात आणला आहे असे या संस्थेने म्हटले आहे. या संस्थेचा हा अहवाल सादर झाल्यानंतर त्यातून भारतातही मोठी खळबळ उडाली असून अदानी उद्योग समुहातील कंपन्यांचे शेअर्सचे भाव कोसळले आहेत.
मागील कोणत्याही पंतप्रधानांपेक्षा मोदींच्या काळात देश अधिक कर्जबाजारी
अदानी उद्योग समुहातर्फे 27 जानेवारीपासून 20 हजार कोटी रूपयांचा फॉलो-ऑन- पब्लिक ऑफर एफपीओ बाजारात आणला जाणार आहे. त्याच्या दोन दिवस आधीच ही मोठी बातमी आली आहे. या संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे की, अदानी उद्योग समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांची एकूण मालमत्ता 120 अब्ज डॉलर्स इतकी आहे, पण यातील तब्बल 100 अब्ज डॉलर्स त्यांनी केवळ गेल्या तीन वर्षात कमावले आहेत. त्यांच्या समुहातील सात कंपन्याच्या शेअर्सच्या भावात खोटी वाढ करून त्यांनी ही संपत्ती कमावली आहे असे या संस्थेचे म्हणणे आहे.
Japan : दक्षिण कोरिया-जपान दरम्यान जहाज बुडाले; 22 पैकी 14 कर्मचाऱ्यांना…
या तीन वर्षांच्या अवधीत अदानी उद्योग समुहातील सात कंपन्यांच्या शेअर्सच्या भावात तब्बल 819 टक्क्यांची वाढ झाली आहे. हा सरळसरळ फ्रॉड आहे असे त्यांचे म्हणणे आहे. अदानी यांनी भ्रष्टाचार, मनिलॉंड्रिंग, आणि करचुकवेगीरी करून प्रचंड माया जमवली असून त्यांनी ही सारी माया विदेशात पाठवली आहे. त्यासाठी त्यांनी अफ्रिकन देश, मॉरिशस पासून संयुक्त अरब अमीरातीपर्यंत अनेक देशांमध्ये बनावट कंपन्या स्थापन केल्या आहेत आणि त्यात ही गुंतवणूक वळवण्यात आली आहे.
अदानी उद्योग समुहातील सात कंपन्यांची आर्थिक स्थिती आणि त्यांचे एकूण व्यवहार लक्षात घेतले तरी या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव 85 टक्क्यांनी कृत्रिमपणे वाढवले गेले आहेत हे त्याच्या फेसव्हॅल्युवरूनच स्पष्ट होते आहे असेही हिंडेनबर्गने म्हटले आहे. अदानी उद्योग समुहातलेच माजी अधिकारी, अन्य डझनवारी खासगी व्यक्ती, आणि सुमारे दहा देशातील प्रत्यक्ष साइट व्हिजीट करून आम्ही हा निष्कर्ष काढला आहे असेही या संस्थेने म्हटले आहे. या अहवालामुळे आर्थिक व राजकीय क्षेत्रात मोठीच खळबळ उडण्याची शक्यता आहे. हे प्रकरण केंद्र सरकारसाठीही डोकेदुखी ठरू शकते.
अदानी समुहाने फेटाळले आरोप
अदानी उद्योग समुहानेही लगोलग हे सगळे दावे फेटाळनू लावले आहेत. आमच्याशी कोणताही संपर्क न साधताच या संस्थेने अचानकच ही माहिती दिली आहे असे त्यांनी म्हटले आहे. तसेच हा अहवाल ज्या टायमिंगच्या आधारे जाहीर झाला आहे त्याबद्दलही अदानी समुहाने प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी म्हटले आहे की आमचा एफपीओ 27 जानेवारीला बाजारात येणार आहे त्याच्या दोन दिवस आधी हा अहवाल जाहीर होणे याचा अर्थ हे सगळे ठरवून केलेले षडयंत्र असावे. हे वृत्त वाचून आम्हाला धक्का बसला असेही अदानी समुहाने म्हटले आहे. अदानी समुहाचे मुख्य वित्तीय अधिकारी जुगेशिंदरसिंग यांनी गेल्या 21 जानेवारीला म्हटले होते की आमच्या समुहावरील कर्जाच्या संबंधात एकाही गुंतवणूकदाराने शंका उपस्थित केलेली नाही. गुंतवणूकदारांनी आमच्यावर कायमच मोठा विश्वास दाखवला आहे.