नगर – सत्यजीत तांबे यांच्या नावाचा एबी फॉर्म नव्हता. मात्र पक्षाने दोन कोरे एबीफॉर्म दिले होते. अर्थात उमेदवाराला एकच फॉर्म दिला जातो. पण काही अडचण नको म्हणून पक्षाने दोन फॉर्म दिले, यापेक्षा आम्ही काय करू शकतो. त्यांना दिलेले एबी फॉर्म त्यांनी कचऱ्यात टाकून दिला. जर सत्यजीत तांबेंना उमेदवारी पाहिजे होती. तर ते बोलले पाहिजे होते. पण ते कोणी काही बोलले नाही. शेवटपर्यंत डॉ. सुधीर तांबेच अर्ज भरणार असे सांगण्यात आले. पण त्यांनी अर्ज दाखल न करता मुलाचा अर्ज दाखल केला. याला पक्ष काय करणार, त्यांच्या परिवारातील वाद होता.पण पक्षाला आरोपीच्या पिंजरात उभे केले जात आहे. त्यात पक्षाचा काय दोष आहे, असा सवाल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केला.
महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित महाविकास आघाडीच्या बैठकीतनंतर आ. पटोले बोलत होते.त्यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष तथा ग्रामीण जिल्ह्याचे प्रभारी अध्यक्ष किरण काळे, कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख यांच्यासह तिन्ही पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
पटोले म्हणाले, पक्षाकडून कोणताही गोंधळ झाला नसल्याचे सांगत याला संपूर्णत: तांबे कुटुंबीयच जबाबदार आहे. उमेदवारी झाल्यावर माझ्याकडे येऊन आभार व्यक्त करणारे डॉ. तांबे यांना त्याचवेळी आपल्याऐवजी मुलाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली नाही. पक्षाची उमेदवारी देणे ही एका दिवसातील प्रक्रिया नसते. या मतदारसंघातही ती खूप लवकरच सुरू झाली होती. यासाठी मी, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आदी नेत्यांची बैठक झाली. त्यात डॉ. सुधीर तांबे यांनाच पुन्हा संधी देण्याचा निर्णय झाला. तो जाहीरही झाला. त्यानंतर डॉ. तांबे भेटायला आले. त्यांनी उमेदवारी दिल्याबद्दल आभारही व्यक्त केले. तेव्हा आणि त्यानंतरही त्यांनी आपल्याऐवजी मुलगा सत्यजीत यांना उमेदवारी देण्याची मागणी केली नव्हती. तशी ती केली असती, तर तेव्हाच त्यावर विचार झाला असता.
पुढे सत्यजीत यांच्यासंबंधी भाजपच्या संबंधाने वेगळी कुजबुज ऐकायला मिळू लागली. आम्ही सावधच होतो. पक्षाचा एबी फॉर्म उमेदवाराचं नाव टाकून आणि एकच प्रत दिली जाते. या प्रकरणात आम्ही दोन आणि तेही कोरे फार्म दिले होते. त्यांच्या परिवारातील वादात आम्हाला पडायचे नव्हते. तुमच्यापैकी जो कोणी उमेदवार ठरेल, त्याचे नाव टाकून अर्ज दाखल करा, असे त्यांना सांगितले होते. शेवटपर्यंत डॉ. तांबे अर्ज भरणार असे सांगत होते. ऐनवेळी डॉ. तांबे यांनी अर्ज भरलाच नाही, सत्यजीत यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. आमदार बाळासाहेब थोरात यांची तब्यात बरी नसल्याने ते सध्या रुग्णालयात आराम घेत आहे. त्यांच्याशी पक्षाने नेते संपर्क असून त्यांनी आपण पक्षाबरोबर असल्याचे स्पष्ट केल्याचे पटोले यांनी एका प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.