पुणे – पावसाळा संपला तरी आंबिल ओढा सीमाभिंतीच्या कामाची “वर्क ऑर्डर’च देण्यात आलेली नाही. त्यामुळे यामध्ये काही अडचणी आहेत का, याबाबतची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी संबंधित विभागाकडून मागवली आहे.
आंबिल ओढ्याला आलेल्या पुराच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या ओढ्याला सीमाभिंत बांधण्याची निविदा प्रक्रिया मागील महिन्यात प्रशासनाने राबवली होती. स्थायी समितीनेही तिला मंजुरी दिली होती, असे असताना अद्याप या कामाला “वर्कऑर्डर’च देण्यात आली नाही. ती का देण्यात आली नाही? याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
आंबिल ओढ्याला आलेला पुरामुळे अनेक ठिकाणची सीमाभिंत पडली आहे. सुमारे 3 किमी लांबीच्या सीमाभिंतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळेच ती बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती.आंबिल ओढ्याकडेला राहणाऱ्या नागरिकांना पुराचा धोका कायम आहे.
या कामाची अद्याप वर्कऑडर देण्यात आली नाही. कामात काय अडचणी आहेत. याची माहिती संबंधित विभागाकडून मागवण्यात आली आहे. ज्या ठिकाणी काम करायचे आहे. येथील जागा ताब्यात आली नसल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे. यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल.
– विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका