मुंबई : मराठा आरक्षण देण्यासंदर्भात मा. राष्ट्रपती व केंद्र शासनाने पावले उचलावीत, यासाठी मा. राष्ट्रपती महोदय व केंद्र शासनाला लिहिलेले पत्र देण्यासाठी शिष्टमंडळासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मंगळवारी (दि. ११ मे २०२१) भेट घेतली. आमच्या भावना केंद्रापर्यंत पोचविण्याची विनंती यावेळी त्यांना केली आहे. तसेच मराठा आरक्षणासंदर्भात लवकरच मा.पंतप्रधान यांची भेट घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
राज्यातील अतिशय संवेदनशील राजकीय आणि सामाजिक मुद्दा असलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निकाल दिला आहे. राज्य सरकारनं तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. मराठा आरक्षण देणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळे आम्ही आरक्षणाचा कायदा रद्द करत आहोत, असं सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीदरम्यान सांगितलं.
मराठा समाजाला केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत आरक्षण देण्याची मागणी नरेंद्र मोदींकडे या पत्राद्वारे करण्यात आली आहे. आता या पत्रावरुन पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी ‘गोड बोलणे आणि पाठीत सुरी खुपसने’ असं म्हणत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हणाले सौरभ खेडेकर
‘पुन्हा एकदा मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचा कार्यक्रम सुरु झाला आहे. माननीय गायकवाड आयोग स्वीकारुन सरसकट ओबीसी समावेश जे पूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत आहे त्या विकल्पाकडे ठरवून दुर्लक्ष करून केंद्राकडे बोटं दाखवून हात झटकण्याचा घृणास्पद प्रकार मुख्यमंत्री करत आहेत. ज्या व्यक्तीने कधीही शब्द बदलला नाही अशा बाळासाहेबांचे ते वारस आहेत, परंतु सध्या बारामतीची हवा त्यांना जरा जास्तच मानवलेली दिसतेय, ”गोड बोलणे आणि पाठीत सुरी खुपसने”, असं म्हणत सौरभ खेडेकर यांनी निशाणा साधला आहे. ते मंगळवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.