महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; अपुरी जागा, गळके छत, तुटलेले दरवाजे, पडक्या भिंती
– संतोष कचरे
आंबेगाव बुद्रुक – भारतीय भाषांमध्ये अंगणवाडी शब्दाचा अर्थ अंगणातील निवारा असा आहे. भारत सरकारने 1975 मध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाड्या चालू केल्या त्याचा मुख्य उद्देश बालकांमधील कुपोषणाशी हटविणे हा होता.सर्वसामान्य, गरीब कुटुंबातील बालकांना सकस आहार व मोफत शिक्षण मिळावे या हेतून अंगणवाड्या स्थापन झाल्या. आज आंबेगाव बुद्रुक मध्ये 90 बालक अंगणवाडीत शिक्षण घेत असून त्यांना शिक्षण देणाऱ्या अंगणवाड्याच कुपोषित झाल्या आहेत.
अंगणवाड्यांमध्ये मिळणाऱ्या कोणत्याच सुविधा मिळत नसल्याने येथे बालकांचा सर्वांगिण विकास कसा होणार? असा सवाल नागरिकांतून केला जात आहे. यामुळे स्मार्ट पुण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महानगरपालिकेने शहरातील सर्वच अंगणवाड्यांचा पाहणी करून नियोजनबद्ध विकास करावा, अशी मागणी होत आहे.
धनकवडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्वच अंगणवाड्यांची दुरवस्था झाली आहे. साईनाथ मंदिराजवळील अंगणवाडीच्या छताचे पत्रे 70 टक्के गंजले आहे. या पावसाळ्यात अंगणवाडी पाणीच पाणी झाले होते. त्यानंतही याबाबत प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंगणवाडी अपुऱ्या जागेत भरते तसेच याच्या भिंतीही पडण्याच्या मार्गावर असून दरवाजेही अर्धवट तुटले आहेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, शौचालय नसल्याने मुलांना उघड्यावरच जावे लागते. अंगणवाडीच्या बाजूलाच कचऱ्याचे ढिग साचले आहेत. येणारे-जाणारे नागरिक भिंतीवरच लघुशंका करतात. यामुळे दुर्गंधी पसरली आहे. यातून बालकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. आंबेगाव बुद्रुक सर्वे नं. 16 ओमसाईनगर माधील यशोदिप बालक मंदीर ही अंगणवाडी 2007 पासून सुरु असून ही अंगणवाडीही एका खासगी इमारतीत तिसऱ्या मजल्यावर तोकड्या जागेत भरत आहे. येथे 50 बालक अंगणवाडीत शिकत असून एक शिक्षिका व एक मदतनीस काम करीत आहेत. आंगणवाडीसाठी महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारचे अनुदान आतापर्यंत दिलेले नाही. खोल्या मालकांना भाडे दिलेले नाही. शिक्षक व सेवक यांना कोणत्याही प्रकारचे मानधन नाही. मुलांना स्वखर्चातून खाऊ दिला जातो.
आंबेगाव बु.सर्वे नं. 16 मधील यशोदिप अंगणवाडीत सर्व गरीब व कष्टाची कामे करणाऱ्यांची मुले शिकत असून या मुलांना आम्ही स्वतःच्या खर्चातून खाऊ देत आहोत. अनुदान मिळविण्यासाठी स्थानिक प्रशासन व जिल्हा परिषद अंगणवाडी विभागात व स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन पाठपूरावा करुनही प्रशासनाने दखल घेतलेली नाही.
– धनश्री चिखले, शिक्षिका
अंगणवाडीच्या गळक्या छताच्या दुरुस्तीसाठी महापालिका आयुक्त व धनकवडी क्षेत्रीय कार्यालयात निवेदन देऊन सुध्दा पावसाळ्यात छाताची दुरुस्ती केली गेली नाही. मोडकळीस अलेले दरवाजेही तसेच ठेवले आहेत. पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. लहान मुलांना विपरीत परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागत आहे.
– अलका झरांडे, आंबेगाव बुद्रुक
आंबेगाव बुद्रुक परिसरातील बालके येथे शिकत असून अंगणवाडीच्या दुरुस्तीबाबत महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्राने कळवले आहे. त्यामुळे सदर अंगणवाडीचे दुरुस्तीकडे लवकरात लवकर लक्ष घालावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
– प्रमोद घुले पाटील, अध्यक्ष, शंभूरत्न ब्रिगेड