पुणे -आंबेगाव बुद्रुक परिसरातील वेणुताई चव्हाण तंत्रनिकेतनची सीमाभिंत कोसळून कामगारांचा मृत्यू झाल्या प्रकरणात आर्किटेक्टचा अटकपूर्व, तर, कामगार ठेकेदार पिता-पुत्रांचा नियमित जामीन सत्र न्यायाधीश के.डी.वडणे यांनी फेटाळला.
ज्ञानेश्वर ओंकार निकम यांचा अटकपूर्व, तर, सत्यमेव रामराज चौहान (वय 47) आणि त्यांचा मुलगा दिवाकर (वय 24, बालाजीनगर) या दोघांचा नियमित जामीन फेटाळण्यात आला आहे.
1 जुलै रोजी रात्री झालेल्या घटनेत सहा कामगारांचा मृत्यू झाला होता. तर दोनजण गंभीररित्या आणि आठजण किरकोळ जखमी झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी चौहान पिता-पुत्रांना अटक केली आहे. न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर त्यांनी ऍड. विवेक भरगुडे, ऍड. कुमार पायगुडे आणि ऍड. राकेश ओझा यांच्यामार्फत, तर आर्किटेक्ट निकम यांनी ऍड. हेमंत झंजाड, ऍड. नंदकुमार शिंदे आणि ऍड. राहुल खरे यांच्यामार्फत अटकपूर्वसाठी अर्ज केला होता.
“निकम यांनी केवळ बिल सर्टिफाईड केले होते. प्लॅनचे डिझाईन केले नव्हते. संबंधित संस्थेने दुसऱ्या आर्किटेकद्वारे ते केले होते. तसेही आर्किटेक्टची जबाबदारी केवळ प्लॅन डिझाइनपुरतीच असते. भिंत बांधकामासंदर्भातील जबाबदारी इंजिनिअर, सुपरवायझरची असते. त्यामुळे निकम यांना अटक करण्याची गरज नाही. ते तपासास सहकार्य करण्यास तयार आहेत,’ असा युक्तीवाद ऍड. झंजाड यांनी केला. यास अतिरिक्त सरकारी वकील जावेद खान यांनी विरोध केला.
“या भिंतीचे कामकाज नित्कृष्ट असल्याचा शासकीय अभियांत्रिकी विद्यालयाचा अहवाल प्राप्त झाल आहे. निकम हे महापालिकेचे आर्किटेक्ट आहेत. बांधकाम निकृष्ट असताना सर्टिफाईड करून बिलाची रक्कम त्यांनी अदा केली आहे. त्यांनी गुणवत्ता तपासून बांधकाम रोखले असते, तर ही दुर्घटना घडलीच नसती. त्यामुळे त्यांचा गुन्ह्यात सहभाग दिसत आहे. मृत्यूमुखी कामगार अत्यंत गरीब कुटुंबातील आहेत. त्यामुळे साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता आहे. यासाठी निकम यांचा अटकपूर्व, तर, चौहान पिता-पुत्रांचा जामीन फेटाळावा,’ अशी मागणी ऍड. खान यांनी केली. दरम्यान, सत्र न्यायालयाच्या निर्णयावर उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे ऍड. हेमंत झंजाड यांनी सांगितले.