कोल्हापूर – प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती झाली आहे. आंबेडकर यांचा महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही. आमच्यासोबत येण्याबाबतचा आंबेडकर यांचा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा झाली नसल्याचे सांगितले.
शरद पवार हे आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. तुमच्यावरून ठाकरे गट आणि आंबेडकर यांच्यात वाद असल्याचे चित्र आहे, याकडे शरद पवार यांचे लक्ष वेधले. त्यावर त्यांनी थेट उत्तर दिले.
शरद पवार म्हणाले, ठाकरे गट आणि वंचित यांच्या चर्चेत आम्ही कुठे नव्हतो.
आमच्या ज्या चर्चा झाल्या त्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना या सर्वांनी एकत्र निवडणुकीला सामोरे जावं, अशी आमची मानसिकता आहे. तो प्रयत्न आम्ही सुरू ठेवणार आहोत. महाविकास आघाडीने एकत्र जाण्याची स्पष्टता आहे. या पुढचे निर्णय कसे घ्यायचे याचा संवाद सुरू आहे, असे त्यांनी सांगितलं. यावेळी पवार यांनी वंचितचा उल्लेख केला नाही. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीला पत्र लिहिले आहे. त्यांच्या या प्रयत्नांची पवारांनी खिल्ली उडवली. त्यांनी पत्र पाठवलं की नाही माहीत नाही. पण कोल्हापूर, नांदेड आणि पंढरपूरची निवडणूकीवेळी त्यांना का आठवलं नाही? त्यांना आताच का सूचलं हे माहीत नाही, असा चिमटा पवारांनी काढला.
राष्ट्रवादीला फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधींना फोडून अन्य ठिकाणी नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिंदे गटात हा प्रकार अधिक दिसतो. निवडणुका जवळ येतात तेव्हा ही परिस्थिती असते. पण त्याची चिंता करायची गरज नाही, असं ते म्हणाले.
केसी चंद्रशेखर राव यांनी तेलंगणात विरोधी पक्षांचा मेळावा घेतला. त्यावरही त्यांनी भाष्य केले. चंद्रशेखर राव यांनी यापूर्वीही अनेक मेळावे घेतले. त्यांच्या यापूर्वीच्या मेळाव्याला मीही हजर होतो. त्यांच्याशीही आमचा सुसंवाद सुरू आहे. देशातील सर्व घटकांनी एकत्र यावं हा त्यांचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.