मुंबई – शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर औरंगाबाद जिल्ह्यात हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्या प्रकरणात विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांना पत्र लिहुन त्यांचे लक्ष वेधले आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी असेही त्यांनी म्हटले आहे.
महालगाव वैजापुर येथे अदित्य ठाकरे यांच्या बैठकीत अडथळे निर्माण केले गेले. त्यावेळी सरकारने अदित्य ठाकरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेकडेही दुर्लक्ष केले.मिंधे गटाचे आमदार रमेश बोरावणे यांनीच हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप त्यांनी केला असून त्यांच्यावर कारवाईची मागणीही दानवे यांनी केली आहे. वैजापुर येथे आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेकही करण्यात आल्याचे त्यांनी या पत्रात निदर्शनाला आणले आहे. अदित्य ठाकरे हे सध्या शिवसंवाद यात्रेवर असताना वैजापुरात काल सायंकाळी हा प्रकार घडला आहे.