नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर २३ जूनपासून सुरु होणारी अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवात होण्यापूर्वीच यात्रा रद्द करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
जम्मू येथील राजभवनात झालेल्या अमरनाथ यात्रा समितीच्या बैठकीत उप राज्यपाल गिरिशचंद्र मुर्म यांनी यासंदर्भात निर्णय घेतला. जम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत ४०७ कोरोनाचे रुग्ण आढळले असून ज्या मार्गावरुन अमरनाथ यात्रा निघते त्या मार्गावरील काश्मीरमध्ये ३५१ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. श्रीनगर, बारामुल्ला, बांडीपोरा आणि कुपवाडा हे चार जिल्हे हॉटस्पॉट म्हणून घोषीत करण्यात आले आहेत.
श्रायन बोर्डाचे अध्यक्ष आणि उपराज्यपाल मुर्म यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरनाथ यात्रेवरील मार्गातील ७७ ठिकाणे ही रेड झोनमध्ये आहेत. यात्रेसाठी जेवणाची व्यवस्था आणि राहण्यासाठी कँम्पची तयारी करावी लागते. सध्याच्या परिस्थितीत हे शक्य नाही. त्यामुळे यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नियोजित वेळेनुसार यात्रेच्या नोंदणीसाठी १ एप्रिलपासून सुरुवात होणार होती. यात्रेपूर्वी मार्गावरील बर्फ हटवण्याचे काम सुरु होते. मात्र कोरोनामुळे सध्याच्या घडीला यातील कोणतीच गोष्ट करणे शक्य झाले नव्हते. अमरनाथ यात्रेकरुंची राहण्याची व्यवस्था ज्या ठिकाणी करण्यात येते त्या ठिकाणी सध्याच्या घडीला क्वॉंरंटाइन केंद्र उभा करण्यात आले आहे. दरवर्षी या यात्रेची परिसरातील नागरिक प्रतिक्षा करत असतात. या यात्रेवर अनेक जणांनावर्षभराचे उत्पन मिळते. मात्र आता यात्रा रद्द झाल्यामुळे या नागरिकांवरही संकट ओढवण्याच संकेत दिसत आहेत.