नवी दिल्ली – पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी बुधवारी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्या भेटीत अमरिंदर यांनी वादग्रस्त केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली.
कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकरी आठ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. आंदोलकांमध्ये पंजाबमधील शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्याचा संदर्भ घेऊन अमरिंदर यांनी कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करणारे पत्र मोदींना सादर केले.
कृषी कायद्यांमुळे शेतकरी संतप्त बनले आहेत. त्याचा गैरफायदा पाकिस्तानचा पाठिंबा असणाऱ्या भारतविरोधी शक्ती उठवू शकतात. त्यामुळे पंजाबबरोबरच देशाच्या सुरक्षेपुढे धोका निर्माण होऊ शकतो. शेतकरी आंदोलनामुळे पंजाबमधील आर्थिक व्यवहार प्रभावित होत आहेत.
त्याशिवाय, सामाजिक सलोख्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी आंदोलनाचा पेच मिटवण्यासाठी केंद्र सरकारने तोडगा काढावा. शेतकऱ्यांची चिंता दूर करण्यासाठी हस्तक्षेप करावा, असे आवाहन पत्रातून मोदी यांना करण्यात आले आहे.