नवी दिल्ली – अमृतसरमधील जालियनवाला बागेच्या स्मारकाचे नूतनीकरण करण्यात आले असून त्या कामांचे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रार्पण केले आहे. तथापि, त्या निमित्ताने स्मारकाच्या ठिकाणी जे डिस्को लायटिंग करण्यात आले त्यावरून तीव्र संताप व्यक्त केला जात असून हा तेथे हौतात्म्य पत्करणाऱ्यांचा अवमान झाला आहे, अशी टीका केली जात आहे. त्यात आता राहुल गांधी यांनीही उडी घेत मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
मात्र यावर कैप्टन अमरिंदर सिंह यांनी मोदी सरकारचे कौतुक केले आहे. त्यांनी या कार्यक्रमाबाबत म्हंटले की,’अमृतसरमधील जालियनवाला बागेच्या स्मारकाचे नूतनीकरण कार्यक्रमा चांगला झाला आहे.’
ते पुढे म्हणाले,’जे काहीही बदल तेथे केले गेले ते चांगले करण्यात आले आहे. वेळेत ज्या जुन्या इमारत आहे त्यांना सुद्धा दुरुस्त करायला हवे.’
तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी म्हटले होते की, ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात कधी भाग घेतला नाही, त्या लोकांकडून हुताम्यांचा हा अक्षम्य अवमान झाला आहे. ज्यांना हौतात्म्य या शब्दाचा अर्थच माहिती नाही, हौतात्म्य म्हणजे काय याची कल्पना नाही, अशा लोकांकडून त्यांचा हा अवमान झाला आहे. हुताम्यांच्या पुत्रांना हा अवमान कदापिही सहन होणार नाही.
मी स्वतः हुतात्म्याचा पुत्र आहे मीही हे सहन करणार नाही, असेही राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटरवर म्हटले आहे. आम्ही या हुतात्म्यांच्या क्रूर थट्टेचा निषेध करतो, असेही त्यांनी म्हटले आहे. जालियनवाला बाग स्मारकाच्या ठिकाणी करण्यात आलेल्या लायटिंग शो आणि लेसर शोचा व्हिडिओही राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर सोबत शेअर केला आहे. या प्रकाराबाबत अनेक राजकीय नेत्यांकडून टीका सुरू आहे.
इतिहासाचा वारसा नष्ट करण्याच्या प्रयत्नांचाच हा एक भाग आहे अशी टीकाही आता सुरू झाली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येच्युरी यांनीही या प्रकरणावरून सरकारवर टीका केली असून भाजपचे लोक स्वातंत्र्यलढ्यापासून दूर राहिले होते. त्याचा संदर्भ त्यांनीही दिला आहे.
जालियनवाला बागेत ब्रिटिशांनी सुमारे शंभर वर्षांपूर्वी जो गोळीबार केला त्यात एक हजार लोकांनी हौतात्म्य पत्करले असून त्यांच्या स्मारकाच्या ठिकाणी डिस्को लायटिंगचा जल्लोष मलाही अवमानकारक वाटतो तो अक्षम्य आहे, असे कॉंग्रेस नेते गौरव गोगोई यांनी म्हटले आहे. हुतात्म्याविषयी या सरकारच्या मनात कृतज्ञता नसल्याची टीका कॉंग्रेसने केली आहे.