नागरिकांना दक्षतापालनासाठी पालकमंत्र्यांचे कळकळीचे आवाहन
अमरावती : जिल्ह्यात निधन झालेल्या एका व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून, या पार्श्वभूमीवर आता अधिक दक्षता घेण्याची गरज आहे. त्यामुळे प्रशासनाने अधिक सतर्क व कठोर राहून कामे करावीत, असे निर्देश राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी शनिवारी दिले.
नागरिकांनीही आता वेळेचे गांभीर्य ओळखावे. हा आपल्या सर्वांच्या कुटुंबाचा, राज्याचा, देशाचा प्रश्न आहे. त्यामुळे एकजुटीने दक्षतेचे पालन केल्याशिवाय आपण या संकटावर मात करू शकणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील माझ्या सर्व बंधू, माता, भगिनी, समस्त नागरिकांनी गर्दी टाळावी. घराबाहेर पडू नये. आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे. ही संयम आणि धैर्याची परीक्षा पाहणारी वेळ आहे. त्यामुळे सतर्क राहा, सगळ्यांनी दक्षता पाळा अन्यथा इतर देशांप्रमाणे आपल्या देशातही हे संकट भीषण रूप धारण करायला वेळ लागणार नाही, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रशासनाने कठोर व सतर्क राहून कामे करा…..
जिल्ह्यात निधन झालेल्या व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे यंत्रणेने आता अधिक सजगपणे काम करण्याचे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. त्या म्हणाल्या की, निधन झालेल्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी, संबंधित परिसरात राबवावयाची कार्यवाही प्रशासनाने काटेकोरपणे करावी. कुठलीही हलगर्जी होता कामा नये. ही संकटाची वेळ आहे. डोळ्यात तेल घालून कामे करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
आरोग्य यंत्रणा, महापालिका व जिल्हा परिषद या यंत्रणांनी आपल्या वैद्यकीय पथकांना अधिक सजग करावे. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात अनियमितता येणार नाही, याची काळजी जिल्हा प्रशासनाने घ्यावी. विविध यंत्रणा चांगले काम करत आहेत. मात्र, आता अतिदक्षतेची वेळ आहे. या काळात सजग राहून कामे करावीत व स्वत:चीही काळजी घ्यावी. प्रवासी नागरिक, मजूर बांधवांसाठी निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. तिथे पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले.
नागरिकांना आवाहन….
नागरिकांना आवाहन करताना पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, आपल्या सहकार्याशिवाय कोरोनाविरूद्धची लढाई जिंकता येणार नाही. हा विषाणू कोणताही जातधर्म पहात नाही. अतिप्रगत देशातही या संकटाने भीषण रूप धारण केले आहे. त्याची बाधा सगळ्यांना सारखीच होते. त्यामुळे जातपात, धर्म, सारे विसरून या संकटाचा एकजुटीने सामना करूया. प्रशासन त्याची जबाबदारी पार पाडत आहे. आपणही आपली जबाबदारी ओळखून दक्षता घेऊया व आपल्या कुटुंबाचे, राज्याचे, देशाचे रक्षण करूया. स्वच्छतेचे पालन, गर्दी टाळणे व घराबाहेर न पडणे ही दक्षता प्रत्येकाने पाळलीच पाहिजे. सर्वांनी एकदिलाने दक्षतेचे पालन केल्यास आपण हे युद्ध नक्की जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.