नवी दिल्ली – देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर झालेल्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतानाच टोकियो ऑलिम्पिकमधील पदक विजेत्या खेळाडूंचाही गौरव केला.
तसेच मोदी यांनी या खेळाडूंच्या सन्मानार्थ टाळ्या वाजवताना त्यांच्या कामगिरीला सलाम करत आगामी काळातील सरस कामगिरीसाठी शुभेच्छाही दिल्या. यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, आपल्या खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकून देशाचे नाव उंचावले आहे. मी सर्व देशवासीयांना खेळाडूंसाठी पुढे येऊन त्यांच्या गौरवार्थ टाळ्या वाजविण्याचे आवाहन करतो. संपूर्ण देशाने त्यांच्या कामगिरीला दाद द्यावी.
ऐतिहासिक लाल किल्ल्यावर झालेल्या या कार्यक्रमात टोकियो ऑलिम्पिकचे सर्व पदक विजेते खेळाडू उपस्थित होते. यात भालाफेकपटू सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, वेटलिफ्टर मीराबाई चानू, भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघातील खेळाडू यांचा समावेश आहे. नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने चमकदार कामगिरी केली.
भारतीय खेळाडूंनी एकूण 7 पदके जिंकली. यामध्ये 1 सुवर्ण, 2 रजत व 4 ब्रॉंझपदकांचा समावेश आहे. ट्रॅक अँण्ड फील्डमध्ये प्रथमच भालाफेकपटू नीरज चोप्राने देशाला सुवर्णपदक जिंकून दिले. त्याच्यासह महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू आणि कुस्तीपटू रवीकुमार दहिया यांनी रजतपदक पटकावले. तर, तब्बल 41 वर्षानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाने ब्रॉंझपदक मिळवले.
बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, मुष्टियुद्ध खेळाडू लोवलिना बोर्गोहेन आणि कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनीही ब्रॉंझपदके मिळवली. 2012 सालच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने सर्वाधिक 6 पदके जिंकली होती. यंदा देशाने सात पदके प्राप्त केली.
पंतप्रधानांनी निवासस्थानी घेतली खेळाडूंची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवासस्थानी या सर्व खेळाडूंची भेट घेतली आणि त्यांच्यासह नाश्ता केला. सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा व पी. व्ही. सिंधू यांच्यासह 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये भारताला हॉकीत पदक मिळवून देणाऱ्या पुरुष हॉकी संघातील खेळाडू तसेच स्पर्धेतील अन्य पदकविजेत्या खेळाडूंशीही त्यांनी संवाद साधला.