पीएमपीतील कर्मचाऱ्यांना प्रवासीही कंटाळले
पुणे – पीएमपी प्रवाशांच्या तक्रारीसाठी हेल्पलाइन नंबरची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र, संबंधित विभागातील कर्मचारी तक्रारींची दखल घेताना कोणती कार्यवाही करणार याविषयी संदिग्ध उत्तरे देत आहेत. याचबरोबर, तक्रारी चुकीच्या पद्धतीने नोंदवत असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे.
अनेकदा संचलनादरम्यान पीएमपी कर्मचारी व प्रवासी यांच्यात वाद होतात. यामुळे, पीएमपी बस अथवा कार्यालयातील कामकाजाबाबत एखाद्या बाबींविषयी तक्रार करण्यासाठी पीएमपीने हेल्पलाइन नंबर व ऑनलाइन तक्रारी करण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करुन दिली आहे. मात्र, अनेकदा हेल्पलाइन नंबरवरुन तक्रारींची दखल घेताना कर्मचारी चालढकल करतात. याबाबत प्रशासनाने संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना योग्य सूचना करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
याबाबत सचिन रणदिवे म्हणाले, “मी पीएमपी बसने आळंदी ते मनपा या मार्गावर दररोज ये-जा करतो. रविवारी आळंदी येथे तीन बस उभ्या होत्या. मात्र, एकही बस वेळेत सोडण्यात आली नाही. त्यानंतर अचानक दोन बस सोडण्यात आल्या. याबाबत, मी हेल्पलाइन नंबरवरुन तक्रार केल्यानंतर दोन दिवसांनी पीएमपी प्रशासनाने दुसऱ्याच कार्यवाही विषयीचा मोबाइलवर संदेश पाठवला. यामुळे संबंधित विभागाने प्रवाशांच्या तक्रारीची नोंद करताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे.’