कोयनेच्या पाण्यामुळे सिंचनाखाली नाही
विक्रमबाबा पाटणकर यांची टीका; सर्व लोकप्रतिनिधी जबाबदार
कराड (प्रतिनिधी) – पाटण तालुक्यातील सुमारे दीड लाख हेक्टर सिंचन क्षेत्रापैकी कोयना धरणाच्या पाण्यातून 11 हजार एकरही क्षेत्र सिंचनाखाली नाही. तालुक्यातील बंधारे, तलाव तसेच धरणात गेलेल्या जमिनींएवढेही क्षेत्र सिंचनाखाली आलेले नाही. तालुक्यातील लोक सोशिक असून या सोशिकतेला आजपर्यंतचे सर्व लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत, अशी टीका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
पाटणकर म्हणाले, “ज्या पाटण तालुक्याने राज्याला अंधारातून बाहेर काढले. पिण्यासह शेतीच्या पाण्याची सोय केली. तोच तालुका येथील लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे बळी पडला आहे. तालुक्यात सिंचनाचे सुमारे दीड लाख हेक्टर आहे. मात्र, त्यापैकी 11 हजार एकरसुध्दा सिंचनाखाली आले नाही. यासाठी सर्वस्वी लोकप्रतिनिधीच जबाबदार आहेत.’ लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी तालुक्याच्या सिंचनासाठी 18 सिंचन योजना सुरू केल्या.
सध्या त्याही बंदच आहेत. 1967 पासून नदीला येणाऱ्या पुराचा फटका या योजनांना बसला आहे. नदीकाठच्या मोटारी वाहून गेल्या आहेत. आता पुन्हा त्या योजना सुरू करण्यासाठी येणारा खर्च मोठा आहे. त्याचा भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागणार असून शेतकऱ्याला एकरी 9 ते 10 हजार रूपये पाणीपट्टी भरण्याची वेळ येणार आहे.