राजगुरूनगर – शिरूर लोकसभा मतदारसंघात हिदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांचा मतदारसंघ आहे. पक्षाच्या माध्यमातून अनेक विकासकामे करण्यात आली. कोणी कोठेही गेले तरी निष्ठावान शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत. आगामी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकणारच, असा आत्मविश्वास शिवसेनेच्या प्रवक्त्या तथा विधानपरीषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
माजी आमदार स्व. सुरेश गोरे यांची पोकळी जाणवत असल्याचे यावेळी उपसभापती गोऱ्हे यांनी सांगत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी नाशिक वणी येथील सप्तश्रृंगी मातेचे दर्शन घेतले. मशाल ज्योतीचा शुभारंभ उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आला. पाच मशाल ज्योती आणि प्रसाद शिवसेना दसरा मेळाव्यात दाखल होणार आहे.
नाशिकहून पुणे कोल्हापूरकडे जाताना गोऱ्हे यांनी राजगुरुनगर येथे पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पुणे जिल्हा संघटक विजया शिंदे, ऍड. गणेश सांडभोर उपस्थित होते. डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, शिवसेना ही शिवसेना आहे. गरुड पक्षी जशी आकशात आपली झेप घेतो त्या पद्धतीने शिवसेना पक्ष निष्ठावंत शिवसैनिकाच्या सोबत घेऊन मजबूतीने उभा राहाणार आहे.
पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या हत्येनंतर कॉंग्रेस संपली असेच देशात वातावरण असताना कॉंग्रेसचसे डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान पदावरून देशाचे नेतृत्व केले. हा इतिहास विसरून चालणार नाही.